Shirur Crime – खंडाळे (ता. शिरूर) परिसरात घडलेल्या शेतीतील सिंचन साहित्य चोरीच्या प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले असून संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणी ज्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिले होते, त्यापैकीच काही व्यक्ती संशयित आरोपींना पाठीशी घालत असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. यामुळे पोलिसांसमोर या प्रकरणातील खरी सत्यस्थिती उघड करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचन संच, पाइप आणि इतर मौल्यवान साहित्य चोरीला गेले होते. या सलग चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला काही स्थानिक संशयितांवर संशयाची सुई होती, मात्र तक्रारदारांच्या बदलत्या भूमिकेमुळे आणि माहिती लपवण्याच्या प्रकारामुळे तपासाची दिशा अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी स्पष्ट केले की, चोरीच्या या प्रकरणातील प्रत्येक तांत्रिक आणि प्रत्यक्ष बाबीचा बारकाईने तपास केला जात आहे. जर कोणी मुद्दामहून आरोपींना लपवण्याचा किंवा त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून लवकरच मुख्य आरोपींसह संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.