Shirur Crime – शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील मांजरे वस्ती परिसरात २१ जून २०२४ रोजी यश गायकवाड आणि १९ मार्च २०२६ रोजी साईराज मांजरे या दोन बालकांचे मृतदेह एकाच शेतात व सारख्याच स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा लागला असून, दोन्ही बालकांचा खून एकाच नराधमाने केल्याचे निष्पन्न झाले आहे. जून २०२४ मध्ये झालेल्या यश गायकवाडच्या मृत्यूवेळी बिबट्याचा हल्ला असल्याची अफवा पसरली होती, मात्र आता तो खुनाचाच प्रकार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेला आरोपी अक्षय दत्तात्रय मांजरे (वय २२, रा. मांजरेवस्ती, दहिवडी) याने दोन्ही बालकांचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली आहे. यश गायकवाडच्या मृत्यूनंतर तत्कालीन पोलीस यंत्रणेने गांभीर्याने तपास न करता बिबट्याचा ठसा असल्याचे भासवून प्रकरण वनविभागाकडे ढकलले होते. मात्र, वनविभागाच्या रक्ताच्या नमुन्यात वन्यप्राण्याचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले होते. योग्य वेळी तपास झाला असता तर साईराज मांजरेचा बळी गेला नसता, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड पुढील तपास करत आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न दहिवडी येथील साईराज मांजरे याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आधी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावेळी यश गायकवाड प्रकरणात असलेले तत्कालीन पोलीस अधिकारी आमची बाजू ऐकून न घेता आम्हाला हकलून लावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्यासमोर केला. तपासातील त्रुटीमुळे खुनी मोकाट यश गायकवाडच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून योग्य तपास झाला नसल्याने आरोपी तब्बल २१ महिने परिसरात मोकाट फिरत होता. एवढेच नाही तर तो मृताच्या सर्व अंत्यविधींमध्येही सहभागी होता. यामुळे त्याचे धैर्य वाढले आणि त्याने पुन्हा त्याच निर्घृण पद्धतीने आई-वडिलांच्या एकुलत्या एक बालकाचा खून केला. पोलिसांच्या ढिसाळ तपासामुळेच साईराज मांजरेचा बळी गेला.