शिंदेंचे ‘हे’ आमदार म्हणाले “आम्ही एकला चलो रे”च्या भूमिकेत; महायुतीत वादाची ठिणगी, तटकरेंवर हल्लाबोल

MLA Mahendra Dalvi : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याही मिटलेला नाही. पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात संघर्ष असल्याचे चित्र आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रायगड जिल्ह्याचे राजकारण या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असते. नुकत्याच एका कार्यक्रमात शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
तटकरे हे रायगड व महाराष्ट्राला फसवणारे नेते असून त्यांचं कामच फसवणूक करणं आहे असा आरोप दळवी यांनी तटकरेंवर केला आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आम्ही कधीही युती करणार नाही. आम्ही ‘एकला चलो’ या भूमिकेत आहोत, असेही महेंद्र दळवी यांनी म्हटल्याने पुन्हा एकदा महायुतीतील संघर्ष समोर आला आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारण तापणार आहे.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून वरिष्ठांचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. मात्र महायुतीतच राहुन कोणी वेगवेगळे प्रयोग केले तर त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी करु असा महेंद्र दळवी यांनी याअगोदरच दिला होता. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतीच रस्सीखेच होणार असल्याची दाट शक्यता दिसत आहे.
तोडगा कधी निघणार?
शिंदे शिवसेनेच्या अलिबाग मुरुड मतदार संघाच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महेंद्र दळवी यांनी विरोधकांनाही धारेवर धरले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आहे. आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात कोण पालकमंत्री होणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र अद्यापर्यंत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तोडगा काढण्यात यश आलेले नाही.





