शिक्रापूर – शिरूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना एक जागा अपक्ष व बिनविरोध निवडून आली. त्यांनतर सोळा जागेसाठी निवडणूक होत असताना माजी सभापती मंगलदास यांच्या गटाला अवघ्या सात जागा मिळाल्या आणि त्यांच्या गटाला पराभव स्विकारावा लागला. मात्र औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशानुसार अखेर आरक्षण जाहीर झाले आणि त्यांनतर निर्णय आला. अनुसूचित जाती जमातीचा सरपंच असे आरक्षण जाहीर झाले. तर या आरक्षणानुसार गावातून रमेश गडदे हि एकच व्यक्ती निवडून आलेली असून तो बांदल गटाचा सदस्य आहे. त्यामुळे शिक्रापूर ग्रामपंचायतीवर अखेर बांदल गटाच्याच सरपंचांचा झेंडा फडकणार हे निश्चित झाले आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथे ग्रामपंचायत निवडणूक होत असताना माजी सरपंच बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, सोमनाथ भुजबळ, अरुण करंजे यांनी माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पॅनलच्या विरोधात पॅनल टाकून बांदल यांचा पुतण्या निखील बांदल सह बांदल यांचे खंदे समर्थक रामभाऊ सासवडे यांचा पराभव करुन ही निवडणूक ९ विरुद्ध ७ अशी जिंकली.
एक उमेदवार बिनविरोध असल्याने तो कुणाकडेही जाण्याची शक्यता गृहीत धरली तरी ग्रामपंचायतीवर बांदल यांच्या विरोधी गटाचीच सत्ता येणार असे चित्र होते. मात्र शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणूकीपूर्वी जाहिर केलेल्या सरपंच आरक्षणाला स्थगित करुन आरक्षण सोडती पुन्हा करण्याचे निश्चित झाले होते.
दरम्यानच्या काळात औरंगाबाद खंडपिठापुढे अनुसुचित जाती जमातीची पडलेली आरक्षने तशीच ठेवावीत व इतर आरक्षणे पुन्हा करावीत असा आदेश एका याचिकेवरील निर्णयानुसार खंडपिठाने दिला आणि याच निर्णयानुसार शासनाला कार्यवाही करणे आज भाग पडले.
पर्यायाने आज शिरुर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडत कार्यक्रमावेळी शिक्रापूरचे आरक्षण पूर्वी ठरल्याप्रमाणे होईल असे जाहिर करण्यात आले आणि शिक्रापूरात रमेश गडदे हे बांदल गटाचे सरपंच होणार हे निश्चित झाले.
अर्थात या आरक्षणाचा सदस्य विरोधी गटाकडे नसल्याने आणि गडदे हे बांदल गटाच्या पॅनलकडून निवडून आल्याने औरंगाबाद खंडपिठाच्या निकालाची बाब बांदल गटासाठी आनंदाची ठरलेली असून पराभवामुळे नाराज झालेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर आज मोठा आनंद दिसून आला तर आज दुपार पासून बांदल गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर मोठा धुमाकूळ घातला आहे.
आम्ही याचिका दाखल करणार – बापूसाहेब जकाते (पॅनल प्रमुख )
निवडणूक आयोगाने आम्हाला लोकशाही मार्गाने निवडणुका लढवायला लावल्या, लोकशाही निवडणुकांमध्ये बहुमताला महत्व असते, मात्र बहुमत मध्ये आमच्याकडे आरक्षित जागा नव्हती मात्र न्यायालयाने पहिले आरक्षण तसेच ठेवले हा न्यायालयाचा निर्णय आहे, असे होते तर निवडणुका का घेतल्या किंवा आरक्षित जागेसाठी वेगळ्या निवडणुका घेतल्या पाहिजे होत्या, विरोधी गटाचा सरपंच व बहुमत असलेले एका बाजूला असे असल्यास ग्रामपंचायत चालणार कशी असे सांगत आम्ही याबाबत याचिका दाखल करणार असल्याचे पॅनल प्रमुख बापूसाहेब जकाते यांनी सांगितले.
नियतीने आम्हाला न्याय दिला – रामभाऊ सासवडे ( माजी सरपंच शिक्रापूर )
शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वी वार्ड क्रमांक एक मध्ये मला स्वतःला आणि माजी सरपंच जयश्री भुजबळ यांना हरविण्यासाठी तब्बल तीनशे मतदार वार्ड क्रमांक दोन मध्ये टाकण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर केला गेला आणि आमला परभाव पत्करावा लागला. हि बाब आम्ही निवडणूक आयोगापर्यंत नेलेली असून त्याबाबत कायदेशीर मार्गाने आम्ही जाणार आहोत. मात्र नियती कसा न्याय देते त्याचा अनुभव आम्ही आजच्या सोडतीने घेतला असून विरोधकांना नियतीने कशी चपराक दिली ते त्यांनीच पहावे असे बांदल गटाचे पॅनल प्रमुख व माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी सांगितले.