टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिखर धवन ( Shikhar Dhawan) बाबत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शिखर धवन हा मोठा खेळाडू आहे, पण त्याला हवा तसा सन्मान मिळत नाही, असे शास्त्रींनी म्हटले आहे. त्यांच्या मते, ‘बहुतेकांची नजर विराट कोहली आणि रोहित शर्मावर असते त्यामुळे लोक धवनकडे दुर्लक्ष करतात. शिखर धवनने चांगली कामगिरी करूनही त्याला हवी तशी इज्जत मिळत नाही.’ भारताने पहिला एकदिवसीय सामना गमावला मात्र, सामन्यात धवनने ७२ धावांची चांगली खेळी केली होती.
#NZvsIND | शिखर धवनची ‘ही’ मोठी चूक भारताला महागात पडली
मागील बऱ्याच काळापासून शिखर धवनचा ( Shikhar Dhawan ) टी-२० संघात समावेश केला जात नाही. गेल्या दोन टी-२० विश्वचषक स्पर्धेतही धवनला संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे तो आता केवळ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळात आहे. जेव्हा वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाती तेव्हा धवनला कर्णधार बनवले जाते. धवनने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारतासाठी भरपूर धावा केलेल्या आहेत.
विराट आणि रोहितमुळे धवनला योग्य तो सन्मान मिळत नाही
प्राईम व्हिडिओवर बोलताना रवी शास्त्री यांनी म्हटले की, “शिखर धवन ( Shikhar Dhawan ) खूप अनुभवी खेळाडू आहे पण त्याला पाहिजे तसा सन्मान मिळत नाही. बहुतांश लोकांच्या नजरा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर खिळल्या आहेत. तथापि, जेव्हा आपण त्याचा एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी पाहतो तेव्हा त्याने काही मोठ्या संघांविरुद्ध उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत.”
रवी शास्त्री यांनी पुढे म्हटले की, “टॉप ऑर्डरमध्ये डावखुऱ्या फलंदाजाची भूमिका खूप महत्त्वाची असते. धवन हा नैसर्गिक पद्धतीने फलंदाजी करणारा खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यासाठी त्याच्याकडे सर्व प्रकारचे फटके आहेत. जेव्हा चेंडू बॅटवर योग्य पद्धतीने येतो तेव्हा तो खूप चांगला खेळतो. धवनकडे एकदिवसीय फॉरमॅटचा खूप मोठा अनुभव आहे.”