कोलकता : इन्स्टाग्राम एन्फ्ल्युएन्सर असलेली पुण्यातील कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली हिने तिच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी केलेल्या व्हिडीओमुळे कोलकाता पोलिसांनी तिला अटक केली आहे. या देशात लोकशाही अस्तित्वात नसून कुणाला त्याचे मत मांडायचा अधिकारच दिलेला नाहीये, अशा वादग्रस्त विधानांनी पानोलीची अटक गाजली आहे.आता या अटकेवरुन आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात शर्मिष्ठा पानोली म्हणाली होती की, कान्स फोल्म फेस्टीव्हलवेळी अनेक बॉलिवूड स्टार्सनी ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत मौन बाळगले होते. एकही स्टार त्यावेळी पाकिस्तानच्या भूमिकेविषयी बोलला नव्हता. याशिवाय पानोलीने या व्हिडीओमध्ये धार्मिक धर्मगुरुंबाबतही वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसून आले. पानोलीला गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आणि कोलकाता येथे आणण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शर्मिष्ठा पानोलीने अटकेपूर्वी वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकला होता आणि सोशल मीडियावर माफीही मागितली होती. तथापि, पोलिसांचे म्हणणे आहे की, तिला कायदेशीर नोटीस बजावण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले, त्यानंतर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. भाजपा आणि एनडीएच्या नेत्यांनी पानोलीच्या अटकेवर जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी आरोप केला की, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकार फक्त ‘सनातनी व्यक्तींवर कारवाई करते. दुसरीकडे, त्यांच्या नेत्यांविरुद्ध दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. महुआ मोइत्रा आणि सयानी घोष यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरचा हवाला देत त्यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही पानोलीच्या समर्थनार्थ म्हटले आहे की, धार्मिक निंदा निषेधार्ह असली पाहिजे, परंतु धर्मनिरपेक्षता एकतर्फी असू शकत नाही. पश्चिम बंगाल पोलिसांनी पनोलीच्या प्रकरणात निष्पक्ष कारवाई करावी. खासदार कंगना राणावतने शर्मिष्ठाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, राणावत म्हणाते की, मी शर्मिष्ठाने तिच्या व्हिडिओमध्ये काही चुकीचे शब्द वापरले आहेत, यावर सहमत आहे. परंतु आजकाल अनेक तरुण असे शब्द वापरत आहेत. शर्मिष्ठाने तिच्या विधानाबद्दल माफी देखील मागितली आहे. म्हणून हे पुरेसे असावे. म्हणून, आता तिला धमकावण्याची किंवा त्रास देण्याची गरज नाही, तिला ताबडतोब सोडण्यात यावे. त्याच वेळी, काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी या अटकेला ‘पोलिसांच्या अधिकाराचा गैरवापर’ म्हटले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टसाठी आंतरराज्यीय अटकेबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हटले की जोपर्यंत स्पष्ट आणि तात्काळ धमकी दिली जात नाही तोपर्यंत अशी कारवाई योग्य नाही. शर्मिष्ठाच्या अटकेसाठीची कलमे… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिताच्या कलम १९६ (१) (अ) धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा, जात किंवा समुदायाच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, २९९ (कोणत्याही वर्गातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये), ३५२ (शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान करणे), ३५३ (१) (क) (सार्वजनिक दुष्कर्म भडकावणारी विधाने) अंतर्गत पानोलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.