मुंबई : जागतिक वातावरण गढूळ असूनही भारताचे राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर शेअर बाजार निर्देशांकात गेल्या दोन दिवसापासून बरीच वाढ झाली होती. मात्र आज बर्याच गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 206 अंकांनी कमी होऊन 80,157 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 45 अंकांनी म्हणजे 0.18 टक्क्यांनी कमी होऊन 24,579 अंकावर बंद झाला. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. मात्र नंतर नफेखोरी वाढल्यामुळे निर्देशांकांना ती पातळी राखता आली नाही. कोणत्या कंपन्या पिछाडीवर महिंद्रा, एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. पावर ग्रिड, एनटीपीसी, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. उद्यापासून जीएसटी परिषदेची बैठक सुरू होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे या घटनाक्रमाकडे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्याचे वातावरण असल्याचे जियोजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. सध्याच्या पडत्या काळातही ऊर्जा क्षेत्र, एफएमसीजी क्षेत्र, धातू रिअॅल्टी आणि वीज कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली. जीएसटी परिषदेत जर काही सकारात्मक निर्णय झाला तर शेअर बाजारात काही प्रमाणात तेजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एकाच बैठकीत हा निर्णय अपेक्षित नाही. त्यामुळे बराच काळ संदिग्धता राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान परदेशी संस्थागक गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच असून सोमवारी या गुंतवणूकदारांनी 1,429 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशातील गुंतवणूकदार खरेदी करून निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत.