‘फुकटाचे निर्णय हिताचे नसतात’; शरद पवारांची सरकारवर टीका

सांगली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारच्या शेती पाणी मोफत वीज योजनेवर शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे. फुकटाचे निर्णय हिताचे नसतात, त्याचा गैरवापर होतो, अशा शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शेती पाणी योजनेला मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यामुळे आता फुकट वीज झाल्यावर मोटर बंद करायला कोण जाणार ? असा सवाल उपस्थित करत यामुळे पाणी जाऊन जाऊन त्यांच्या मालकिची असणारी जमीन क्षारपड होईल, यामुळे त्यांचे भवितव्य उध्वस्त करायचे नसेल, तर फुकटाचे निर्णय हिताचे नसतात, त्याचा गैरवापर होत असतो, त्याचा गैरवापर न करणं याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी, असं आवाहन देखील शरद पवारांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं आहे.
काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये लाडकी बहीण ही योजना सध्या सर्वाधिक चर्चेमध्ये आहे. सोबतच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. या निर्णयावरून शरद पवारांनी सरकारवर टीका केली.





