Devendra Fadanvis : शक्तिपीठ महामार्गामुळे देखील जीवन बदलणार; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर

मुंबई : काही शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध असला तरी शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचे चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांना हा मार्ग हवा आहे, हा अट्टाहास नाही. परंतु समृद्धी महामार्गामुळे 12 जिल्ह्यातील जीवन बदलले, तसे शक्तिपीठ महामार्गामुळे देखील जीवन बदलणार आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडली.
प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विरोध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातील शेतकरी आज (12 मार्च) आझाद मैदानावरील आंदोलनासाठी एकवटले आहेत. दुसरीकडे अंबादास दानवे यांनी विशेष उल्लेख म्हणून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा विधान परिषदेत मांडला.
यावेळी सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात जमलेल्या शेतकऱ्यांना भेटीसाठी बोलावले पाहिजे, अशी मागणी केली. या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, तो लादायचा नाही, अशी शासनाची भूमिका आहे. मी जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासोबत तेथील शेतकरी कोल्हापूर विमानतळावर माझी प्रतीक्षा करत होते. शेतकरी या महामार्गाला विरोध करत असून त्यांच्या सह्याचे निवेदन त्यांनी मला दिले होते, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.





