केरळच्या आरोग्य मंत्र्याचा दावा, सरकार आव्हान पेलण्यास सज्ज
कोची : केरळमध्ये कोरोना व्हायरसचा दुसरा बाधीत आढळला असला तरी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. आपण दोन वर्षापुर्वी निपाहला पराभूत केले होते. त्यामुळे अशा आव्हानांना सामोरे जाण्यास सरकार सज्ज आहे, अशा शब्दात केरळच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांन विश्वास व्यक्त केला.
अतिसतर्कता आवश्यकता आहेच. पण, घाबरून जाण्याची गरज नाही. सध्या तरी विलगीकरण (आयसोलेशन) हाच सर्वोत्तम पर्याय आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थीर आहे, असे शैलजा म्हणाल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दुसऱ्या रुग्णलाची चाचणी सकारात्मक आल्याचे जाहीर केल्यावर थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अलीपुझ्झा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला बनवलेल्या विलगता कक्षात (आयसोलेटेड वॉर्ड) या दुसऱ्याला रुग्णाला ठेवण्यात आले आहे. या रुग्णालयाबाहेर फिरू नये. बाधीतांशी काही काळ बोलू नये, असे आवाहन रुग्णलायाच्या प्रशासनाने केले आहे. हा रुग्ण 24 जानेवारीला वुहानहून परतला होता. हा रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. पहिला रुग्ण एक महिला असून त्यांच्यावर थ्रीसूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्यांना घरातच एकटे राहण्यास सांगण्यात आले आहे, त्यांन 28 दिवस बाहेर पडू नये. याची अंमलबजावणी सरकार कठोरपणे करेल. दोन बाधीत सापडल्याने आपल्याला आश्चर्य वाटले नाही,असे सांगून त्या म्हणाल्या, राज्यातील शेकडो विद्यार्थी चीनमध्ये शिकत आहेत, त्यावेळी अशी परिस्थिती अपेक्षित असते. विलगीकरण आणि योग्य आराम हाच सर्वोत्तम उपाय असतो, असे त्या म्हणाल्या.
दोन वर्षापुर्वी आम्ही निपाहला सामोरे गेलो. तेच आम्ही कोरोनाबाबत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, निपाह हा सर्वात घातक होता. तरीही आम्ही त्याला परतवले. सरकार सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडेल, असे त्या म्हणाल्या.
चौकट
कोरोना व्हायरसच्या चाचणी वेगाने व्हाव्यात. तसेच त्याचे निकाल तातडीने मिळावेत, अशी अपेक्षा शैलजा यांनी केंदीय आरोग्य मंत्र्यांकडे व्यक्त केली. या परिस्थितीबाबत सायंकाळी वैद्यकीय बुलेटीन काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.