सोलापूर : सोलापूरमधील एका कार्यक्रमात सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य केले तसेच त्यांनी त्यांचे सहकारी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर आपल्या खास शैलीत जोरदार टीका केली. त्यांची ही टीका सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. काय म्हणाले शहाजी बापू पाटील? तानाजी सावंत धाराशिव मधून आमदार आहेत, त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्ष पातळीवर झालेला नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला. तानाजी सावंत हे मोठे शिक्षण संस्था चालवतात. पाच-सहा कारखाने झालेले आहेत. त्यांना आणखी काही कारखाने खरेदी करायचे आहेत.अशा व्यापात ते गुंतल्यामुळे पक्षकार्याकडे त्यांचे कमी लक्ष आहे, असा चिमटा त्यांनी काढला. तानाजी सावंतांना जे मंत्रीपद मिळाले आहेत तेच आश्चर्यकारक आहे, असा टोलादेखील शहाजी बापू पाटलांनी लगावला. तळागाळातून जाणाऱ्या नेत्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात. तानाजी सावंत यांची एन्ट्री अचानकपणे झाली आणि ते बाजूला पण अगदी अचानकपणे निघून गेले असे शहाजीबापू पाटील म्हणाले.