आदरणीय जे. बी. शिंदे यांचे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच चळवळीचे खंदे आधारस्तंभ असलेले शिंदे सर यांच्या जाण्याने चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे. कोल्हापूरमध्ये प्रबोधन सेवाभावी संस्थेच्या मार्फत त्यांनी अनेक उपक्रम राबवले. देवमुक्त धर्ममुक्त तुकारामांची गाथा तसेच संत तुकारामांची आक्रोश गाथा हे त्यांचे ग्रंथ खूपच महत्वाचे आहेत. ज्यामध्ये त्यांनी तुकारामांचा एक साधाभोळा भाविक, त्यानंतर त्यांच्यात वाढत गेलेली चिकित्सक वृत्ती आणि त्यानंतर देवाला जाब विचारणे आणि त्यानंतर त्यांचा नास्तिकतेकडे चा प्रवास या गोष्टी त्यांच्याच अभंगाचे दाखले देत अतिशय सुसंगत पद्धतीने मांडल्या आहेत. शिंदे सरांशी बोलताना कधी जाणवलं नाही की त्यांचे वय एवढे असेल. ते कायमच सकारात्मक आणि ऊर्जेने भारलेले असायचे. सामाजिक परिस्थिती खूप वेगाने बदलत आहे हे पाहून आपल्याला हतबलता येते. मात्र कोल्हापूरच्या मातीमध्ये घडलेले शिंदे सर या परिस्थितीशी दोन हात करण्याच्या गोष्टी आयुष्यभर करत राहिले. मधल्या काळात काही कविता डॉक्टर दाभोळकर यांच्या नावाने व्हायरल व्हायच्या, त्यावेळी लोकांना सांगावं लागायचं की या कविता जे बी शिंदे साहेबांच्या आहेत. अर्थात तोपर्यंत शिंदे सरांशी ओळख नव्हती, की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता. दोन वर्षापूर्वी त्यांना कुठून तरी पुण्यातील नास्तिक मेळाव्याची माहिती समजली आणि माझा फोन नंबर मिळाला. त्यांनी त्यानंतर माझ्याशी अनेक वेळा सविस्तर चर्चा केली, भगतसिंग विचार मंचाच्या कामाचे कौतुक केले. कोल्हापूर मध्ये देखील आपण असे काहीतरी करू असे म्हटले. मागील वर्षी जो मेळावा झाला त्यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांनी देवमुक्त धर्ममुक्त तुकारामांची गाथा तसेच संत तुकारामांची आक्रोश गाथा ही पुस्तके देऊ केली. पुण्यातील स्वरूप प्रकाशनाने ही दोन्ही पुस्तके प्रकाशित केली होती. संत तुकारामांची आक्रोशगाथा – लेखक डॉ. जे. बी. शिंदे संत तुकारामांचे भक्तिप्रधान अभंग बहुतेक सर्वांना माहित असतात, मात्र गाथेमध्ये शेकडो अभंग असे आहेत, ज्यांना आपण देवमुक्त किंवा धर्ममुक्त अभंग म्हणू शकतो. या अभंगात भौतिक सुख आणि नीती यांचा आग्रह धरणारे तुकाराम महाराज भोंदू लोकांवर प्रहार करताना प्रसंगी निरीश्वरवादाची भूमिका देखील मांडतात. संत तुकारामांची आक्रोशगाथा हे पुस्तक तुकाराम महाराजांच्या या स्थित्यंतराविषयी मांडणी करते. लेखक म्हणतात त्याप्रमाणे तुकारामांना तात्कालीन ब्रह्मवृंदाने जो आक्रोश करायला भाग पाडले, त्याचे प्रतिबिंब या अभंगात दिसून येते. म्हणूनच आजवर सिनेमात, मालिकेत किंवा ह.भ.प. मंडळींनी कधी न सांगितलेले तुकाराम जाणून घ्यायचे असतील तर संत तुकारामांची आक्रोशगाथा हा ग्रंथ जरूर वाचावा. डॉ. जे बी शिंदे सर तुकारामांचे तसेच संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी देवमुक्त, धर्म मुक्त तुकारामांची गाथा हे पुस्तक देखील याआधी लिहिले आहे, जे स्वरूप प्रकाशननेच प्रकाशित केलं आहे. “संत तुकारामांची आक्रोशगाथा” या पुस्तकाची मांडणी करताना तुकाराम महाराजांचा जीवनपट आणि अभंगाचे, त्यातील विचारधारेचे बदलते स्वरूप लक्षात घेतले आहे. सुरुवातीला असलेली भोळी भक्ती, नंतर समाजाकडून होणाऱ्या घुसमटीबद्दल देवाकडे तक्रार आणि मदतीला येण्याचे आवाहन, मात्र काहीच न घडल्याने आलेले नैराश्य, गाथा बुडवणे, कीर्तनावर बंदी, सनातन्यांच्या प्रभावामुळे आणि दहशतीमुळे अनुयायांची घटणारी संख्या.. या सर्वांचा अभंगाच्या निर्मितीवर झालेला परिणाम शिंदे सरांनी अधोरेखीत केला आहे. कळो आले ऐसे आता नाही सत्ता तुम्हासी.. तुका म्हणे गुण झाला हा विठ्ठल हीन शक्ती.. असे ठामपणे सांगत तुकाराम महाराज स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःकडे घेतात. नंतरच्या काळात तुकाराम महाराजांचे अभंग भक्तीपेक्षा विश्वात्मकता, मानवता, चिकित्सा या बाबींवर अधिक केंद्रित झाले आहेत. सर्व तथ्ये तर्काच्या कसोटीवर तपासून घेणे सुरू केल्यावर तुकारामांचे जे विश्वरूप दर्शन घडते, ते डोळे दीपवणारे तर आहेच पण मनाची कवाडे उघडणारे देखील आहे. हे पुस्तक वाचताना तुमच्या मनात तुकाराम महाराज केवळ संत म्हणून उरत नाही, तर त्यांना जगतगुरु का म्हणतात याची जाणीव होते. डॉ जे बी शिंदे सरांचे निधन झाल्याची बातमी समजली. सरांचा व आमचा संबंध चळवळीतील त्यांच्या प्रबोधनामुळेच आला. मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात सर अगदी हक्काचे व्याख्याते, मार्गदर्शक असत.जगतगुरू संत तुकाराम महाराज हे सरांचे आवडते प्रबोधनकार !! त्यामुळेच सर मराठा सेवा संघ संचलित जगतगुरू संत तुकाराम महाराज साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या प्रबोधन कवितांनी साप्ताहिक चित्रलेखा मधून चळवळींना बळ दिले होते. त्यांच्या काही निवडक कविता अनेकांनी संत तुकाराम महाराजांच्या नांवे वापरलेल्या आहेत. एवढा संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा प्रभाव सरांवर होता. ते वर्तमानातील संत तुकाराम महाराज होते.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या शैक्षणिक कार्यावर आधारित त्यांनी पीएचडी प्रबंध सादर केला होता.सरांचे जाणे नुसतेच धक्कादायक नसून प्रबोधन चळवळींचे अमाप नुकसान करणारेही आहे. मराठा सेवा संघ व आमच्या खेडेकर कुटुंबियांच्या वतीने आदरणीय शिवश्री डॉ जे बी शिंदे सरांच्या पावन स्मृतींना भावपूर्ण शिवांजली अर्पण . पुरुषोत्तम व रेखाताई खेडेकर (मराठा सेवा संघ व ३३ कक्ष)