बाजार बोकाळूनही उत्पादक, विक्रेते मोकाट
‘एन-95’शी साधर्म्य असणाऱ्या उत्पादनाची विक्री
– महादेव जाधव
कोंढवा – करोना संसर्गावर दक्षता म्हणून मास्क हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचा वापर न करणाऱ्यांवर दंड वसूल केला जात आहे. जीवनशैलीचा भाग बनलेल्या प्रमाणित दर्जाच्या मास्कला (एन-95) महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु, नामसाधर्म्य असणाऱ्या किंवा एकसारख्या दिसणाऱ्या बनावट मास्कची विक्री बाजारपेठेत होत आहे. कोट्यवधींची उलाढाल सुरू असलेल्या या प्रकाराकडे आरोग्य विभागासह पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे.
करोनाचा संसर्ग होऊ नये, याकरिता मास्कचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याबाबतचे कडक आदेशही आहेत. यातून मास्कविक्री वाढली असून त्याअनुषंगाने बाजारपेठेत अनेक कंपन्यांनी मास्क विक्रीसाठी आणले आहेत. त्यातही जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेल्या एन-95 मास्कसारखे दिसणारे शेकडो ब्रॅन्ड बाजारात मास्कविक्री करीत आहेत. हुबेहूब तसाच आकार, रंगसंगती सारखी परंतु, दर्जा दुय्यम. मात्र, एक सारखेपणामुळे यातून नागरिकांची दिशाभूल होऊन फसवणूक होत आहे.
यामध्ये अगदी साध्या कापडी मास्कपासून ते युज ऍन्ड थ्रोच्या नावाखाली साध्या निळ्या रंगाच्या पारदर्शक कागदाच्या मास्कचीही विक्री होत आहे. यामध्येच जास्तीत जास्त सुरक्षित म्हणून
चर्चेत असलेल्या एन-95 सारख्या दिसणाऱ्या मास्कची उलाढाल मोठी आहे. एन-95 प्रमाणित (ओरिजनल) मास्कची किंमत 150 ते 500 रुपयांपर्यंत आहे. परंतु, हेच बनावट मास्क 100 रुपयालाही मिळत आहे.
ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन काही कंपन्या तसेच व्यापाऱ्यांनी नावाशी साधर्म्य असलेल्या एकसारख्या दिसणाऱ्या मास्कचा बाजार मांडला आहे. नाव आणि उत्पादनातील साधर्म्य सारखेच असले तरी असे मास्क प्रमाणित नसल्याने यातून करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यामुळे असे मास्क वापरणे नागरिकांसाठी करोनाला आमंत्रण देण्यासारखेच आहे. मास्क तयार करणाऱ्या कंपन्यांना जागतिक आरोग्य संघटनेने तसेच आपल्या शासनाने उत्पादन तसेच त्यातील घटकांचे निकष ठरवून दिलेले आहेत, ते तंतोतंत पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे करोना नियंत्रणासाठी संबंधीत यंत्रणेने बनावट मास्क निर्मिती तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
तक्रार कोणाकडे करायची…
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार मास्कचे उत्पादन तसेच विक्री करणे हा मोठा गुन्हा ठरू शकतो. यामुळे अशा मास्क विक्री करणाऱ्यांची तक्रार अन्न औषध प्रशासनासह स्थानिक पोलीस स्टेशनमध्येही करता येऊ शकते. यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.