Harshwardhan Sapkal : केसगळतीला सेलेनियमयुक्त गहू कारणीभूत; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

मुंबई : बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामारे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे, पण तीन महिने झाले सरकारने केस गळती व टक्कल पडण्याच्या कारणाचा अहवाल जाहीर केलेला नाही. सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? सरकार काय लपवाछपवी करत आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
राज्य सरकारचा अहवाल आला नसला, तरी दुसरीकडे प्रख्यात डॉक्टर आणि संशोधक पद्मश्री हिम्मतराव साळुबा बावस्कर यांनी मात्र त्या भागातील त्वचेचे, नखाचे, मातीचे व रेशनवर वितरीत करण्यात आलेल्या गव्हाचे सॅम्पल गोळा करून, त्याची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याचा अहवाल सरकारला दिला. हा सर्व प्रकार सार्वजनिक वितरण प्रणालीतील गव्हामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गव्हात मोठ्या प्रमाणात सेलेनियम आढळून आले आहे ते तब्बल 14 टक्के पेक्षा जास्त आहे. सेलेनियम 1.9 टक्के पर्यंत हानीकारक नाही, पण सेलेनियम अधिक प्रमाणात असल्यामुळे मळमळ येणे, खाज येणे, मधुमेहाच्या तक्रारी येतात हे संशोधन आहे आणि यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोहचले व तसा पत्रव्यवहार बावस्कर यांनी शासनाशी केला. पण सरकारने त्यांच्या अहवालाला केराची टोपली दाखवली, असे सपकाळ म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचा प्रश्न विधान परिषदेत मांडला असता मंत्री महोदयांनी दिशाभूल करणारी माहिती दिली. हा राजकीय विषय नाही, तर लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. यामागे कोणीतरी मोठा माणूस असून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सरकारने लोकांच्या जीवाशी खेळू नये, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.





