Rajnath Singh : नव्या धोक्यांना तोंड देण्यासाठी सुरक्षा साधने सज्ज असावीत; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली अपेक्षा

नवी दिल्ली : आधुनिक जगात सुरक्षा आव्हाने वेगाने विकसित होत आहेत आणि अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेतील परस्परव्याप्ती वाढत आहे. एक मजबूत, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याची खातरजमा करण्याकरिता आपल्या संस्थांनी सहकार्याने काम करणे अत्यावश्यक आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीतील डीआरडीओ भवन येथे अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती निवारण कार्यांसाठी प्रगत तंत्रज्ञान या विषयावरील गृह मंत्रालय – संरक्षण संशोधन आणि विकास संघटना सहयोग परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.
विविध सुरक्षा संस्थांमधील प्रयत्न एकवटून आधुनिक तांत्रिक प्रगतीचा फायदा घेत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे समग्रपणे पहिले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. भारताची सुरक्षा साधने ही सायबर युद्धतंत्र, मिश्र युद्धतंत्र, अंतराळ-आधारित आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यासारख्या नव-नव्या धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्ज असली पाहिजेत.
अंतर्गत सुरक्षा केवळ दहशतवाद, फुटीरतावादी चळवळी आणि नक्षलवादासारख्या पारंपरिक धोक्यांचे व्यवस्थापन करण्याकरिता नव्हे तर देशाच्या आर्थिक आणि सामरिक हितसंबंधांना अस्थिर करू शकणाऱ्या अपारंपरिक धोक्यांसाठी सज्ज राहण्यासाठी देखील असल्याचे त्यांनी नमूद केले. डीआरडीओ आणि गृह मंत्रालयाला एकत्रितपणे काम करून विस्तार करण्यायोग्य उत्पादनांची एक सूची तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या सुरक्षा दलांना वेळेआधी सज्ज राहण्यासाठी सर्वोत्तम साधने आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. डीआरडीओचे आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करणे उत्साहवर्धक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.





