शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची संख्या दुप्पट करणार; सेबीचे तुहिनकांत पांडे यांनी व्यक्त केला मानस

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची संख्या पुढील तीन ते पाच वर्षात दुप्पट करण्याचा मनोदय शेअर बाजार नियंत्रक सेबीचे तुहिनकांत पांडे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात देशभरात सेबीने पाहणी केलेलेल्या नागरिकातील 20 टक्के नागरिकांनी आगामी काळात शेअर बाजारात कोणत्यातरी माध्यमातून गुंतवणूक करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची संख्या दहा कोटी असल्याचे समजले जाते. जर पुढील पाच वर्षात आणखी दहा कोटी गुंतवणूकदार झाले तर भारतातील एकूण गुंतवणूकदारांची संख्या बर्याच देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त होईल. ही आमच्यासाठी समाधानकारक बाब असेल.
कोरोनाकाळात आणि नंतर भारताच्या शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांची संख्या वेगाने वाढत असून सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची संख्या साधारणपणे 12 कोटी 20 लाख इतकी असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय उद्योग महासंघाने या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, सेबी जसा पुढाकार घेत आहे तसाच पुढाकार शेअर बाजारानी घेतल्यास गुंतवणूकदारांची संख्या वाढण्यास काही हरकत नाही.
अमेरिकन शेअर बाजारात करेक्शन झाल्यास त्याचा भारतावर परिणाम होईल का असे विचारले असता भारतातील वाढ बुडबुडा नाही, ती मजबूत स्थूल अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. त्याचबरोबर स्थानिक गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील गुंतवणूक जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेत जर करेक्शन झाले तर त्याचा भारतावर जास्त परिणाम होणार नाही असे त्यांनी नमूद केले. या आर्थिक वर्षात आतापर्यंत शेअर बाजारातून 2.5 लाख कोटी रुपये उभे करण्यात आले आहेत. तर कंपन्यांच्या रोख्यातून 5.5 लाख कोटी रुपये उभे करण्यात आले आहे. त्यावरून भारतातील गुंतवणुकीचे परिस्थिती किती मजबूत झाले आहे याचा अंदाज येतो.





