School Ground : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्य मैदानावर गेल्या अनेक दिवसांपासून जुने बाके, गंजलेली लोखंडी कपाटे, तुटलेली पत्रे, काचा तसेच इतर टाकाऊ साहित्य अस्ताव्यस्त टाकण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकाराकडे शाळा प्रशासन व संबंधित यंत्रणांचे अक्षम्य आणि धक्कादायक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केला असून, हे भंगार साहित्य तत्काळ मैदानावरून हटवावे, अशी जोरदार मागणी शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ५० लाख खर्चून उभारलेले मैदान आज निष्प्रयोजन संत ज्ञानेश्वर विद्यालयात सन २०२२ मध्ये सुमारे ५० लाख रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटचे मैदान उभारण्यात आले होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे आजतागायत या मैदानाचा विद्यार्थ्यांच्या खेळासाठी एकदाही योग्य वापर करण्यात आलेला नाही. परिणामी, हा लाखो रुपयांचा निधी तत्कालीन नगरसेवकांच्या हट्टीपणामुळे व प्रशासकीय बेपर्वाईमुळे अक्षरशः वाया गेला, असा आरोप मनविसेने केला आहे. निधीचा गैरवापर आणि अर्धवट कामाचा आरोप त्यावेळच्या कनिष्ठ अभियंत्याने या मैदानासाठी मंजूर निधी दुसऱ्या ठिकाणी वळविल्यामुळे मैदानाचे काम अर्धवटच राहिले, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. महापालिकेची मुदत संपत आल्याने घाईघाईत उद्घाटन उरकण्यात आले, मात्र, त्यानंतर ज्यासाठी तब्बल ५० लाख रुपये खर्च करण्यात आले, त्या मैदानावर मुलांना खेळूच दिले नसल्याने मातीच्या मैदानावर सिमेंट कॉंक्रिटीकरणाचा घाट का घातला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खेळासाठी नव्हे, भंगार साठवण्यासाठी वापर ५० लाख रुपयांचे मैदान खेळासाठी न वापरता भंगार साहित्य साठवण्यासाठी वापरले जात आहे. जवळपास महिनाभरापासून हे धोकादायक साहित्य मैदानावर पडून असून, यामुळे विद्यार्थ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मैदानावर पडलेल्या गंजलेल्या लोखंडी वस्तू व काचांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मनविसेची ठाम भूमिका, तातडीने कारवाईची मागणी या संपूर्ण प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन शाळेच्या मैदानावरील सर्व भंगार साहित्य त्वरित हटवावे व मैदान स्वच्छ करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि खेळण्यायोग्य वातावरण मिळेल, अशी जोरदार मागणी मनविसेचे विभागाध्यक्ष कुलदीप घोडके व निखिल निंबाळकर यांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास मनविसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.