बीड – अभिनेते आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बीड मधील सह्याद्री देवराईला रविवारी दुपारी आग लागली आहे. या आगीत दोन एकरमधील झाडांचे नुकसान झाले आहे. तब्बल दोन तासांनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश मिळाले.
पालवन गावाजवळ 25 एकर सह्याद्री देवराईचा परिसर आहे. या ठिकाणी सर्व देशी झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. या आगीत वड, पिंपळ आणि लिंबाचे झाड जळून खाक झाले आहे. आगीत तब्बल दोन एकरचा परिसर जळून खाक झाला आहे. सह्याद्री देवराईला आग लागल्याचे लक्षात येताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग जास्त पसरत गेली. तब्बल दोन तासानंतर ही आग विझवण्यात यश मिळाले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे यांनी हात जोडून सर्वांना अशाप्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती केलीय. ते म्हणाले,’“प्रयत्न करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. ही एवढी मोठी जागा असते त्यात चुकून कोणीतरी आग लावतो. त्यांना हात जोडून विनंती आहे की असं करु नका. यामुळे संपूर्ण मानवजातीचं नुकसान होत आहे. शासनाने, ग्रामपंचायतीने आणि सर्वसामान्यांनीही प्रयत्न केले पाहिजेत. हे असं नुकसान होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे’ असेही ते म्हटले आहे.
दरम्यान, सयाजी शिंदे हे वृक्ष लागवडीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. ते सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. सयाजी शिंदे यांनी ‘सह्याद्री देवराई’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विविध देवराया उभ्या केल्या आहेत. सयाजी शिंदे यांनी स्वतःला वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात झोकून दिले आहे. माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू तब्बल 200-300 वर्षे देण्याचे काम झाडेच करत असतात. हीच बाब लक्षात घेत सयाजी शिंदे आणि त्यांची टीम झाडे लावणे आणि ती जगवण्याचे कार्य करीत असते. त्यांच्या या कार्याचे राज्यासह देश विदेशातही कौतुक होत असते. एखाद्या ठिकाणी वृक्षतोड होत असल्यास शिंदे ती वृक्षतोड थाबवण्याचाही अनेकदा प्रयत्न करतात. वृक्षांबाबत नितांत प्रेम असलेली व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख आहे.