Satara Sangli MLC Election: मोठी बातमी! सातारा-सांगलीत शरद पवारांचा ‘तो’ डाव उलटणार? देवेंद्र फडणवीसांच्या एका बैठकीने गेम चेंज
Satara Sangli MLC Election: शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या मोर्चेबांधणीला शह देण्यासाठी भाजपचे दिग्गज मैदानात; अभयसिंह जगतापांसमोर महायुतीचे मोठे आव्हान.

Satara Sangli MLC Election – विधानपरिषदेच्या सातारा- सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीतच बेबनाव दिसून येत होता. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी झालेल्या राड्याचे उट्टे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस काढणार अशी जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीकाँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या मतदारंसघात लक्ष घालत महायुतीपुढे मोठे आव्हान निर्माण केल्याने भाजपपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. महायुतीतील घटक पक्षांनी काम न केल्यास भाजपची जागा धोका येण्याची शक्यता निर्माण झाल्याने या विषयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालत महायुतीत सूर जुळवण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यापुढील अडचणी दूर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात भाजप,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती सत्तेत आहे. तीन पक्षांची एकत्रित ताकद असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राज्यात पीछेहाट होताना दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देत महायुतीतील घटक पक्षांना डावलल्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रसेने एकत्र येत निवडणूक लढली.
या निवडणुकीत २८ जागा जिंकत भाजप मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र, सत्तेसाठी आवश्यक मते मिळविण्याचे आव्हान भाजपसमोर होते. राष्ट्रवादी काँग्रेस २०, शिवसेना १५ व काँंग्रेस १ असे आवश्यक संख्याबळ होते. मात्र, पदाधिकारी निवडीत भाजपने सर्व यंत्रणांचा वापर करत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडत सत्ता मिळवली. यावेळी झालेल्या राड्यामुळे सातारा- सांगली मतदारसंघात उमटणार अशी शक्यता पहिल्यापासून वर्तवण्यात येत होती. या निवडणुकीसाठी भाजपकडून गोरेगाव वांगी (ता. खटाव) येथील धैर्यशील कदम यांना संधी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने वरकुटे मलवडी (ता. माण) येतील अभयसिंह जगताप यांना रिंगणात उतरवले. महायुती एकत्र राहिल्यास ही निवडणूक भाजपसाठी सोपी होती. मात्र, महायुतीत बेबनाव राहिल्याने अभयसिंह जगताप यांच्या आशा भक्कम झाल्या. या मतदारसंघात खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, शशिकांत शिंदे आदींनी लक्ष घातल्याने श्री. जगताप यांची ताकद वाढताना दिसत होती.
त्यामुळे ना. जयकुमार गोरे, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. चंद्रकांत पाटील, खा. उदयनराजे भोसले यांच्यासह भाजपच्या दिग्गजांनी या मतदारसंघावर पक्ष केंद्रित केले आहे. महायुतीतील बेबनावाचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेतील राड्याचा उल्लेख करत शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हा परिषद राडा श्री. देसाई व श्री. मकरंद पाटील सहजासहजी विसरतील अशी परिस्थितीही नसल्याने शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य महायुतीला डावलत अभयसिंह जगताप यांना साथ देतील का?
अशी जोरदार चर्चा सध्या असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत मंत्री शंभूराज देसाई व मंत्री मकरंद पाटील यांच्याशी सुमारे तासभर चर्चा करत त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत सर्वांची एकत्र बैठक घडवून आणल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ही बैठक जर सफल झाली असेल तर भाजपच्या धैर्यशील कदम यांचा विजय या मतदारसंघात निश्चित मानला जात आहे.






