प्रभात वृत्तसेवा सातारा – प्रसिद्ध लेखिका विद्या पोळ जगताप यांनी लिहिलेल्या ‘बाय गं’ कादंबरीला मराठी साहित्य विश्वातील मानाचे समजले जाणारे पाच पुरस्कार मिळाले आहेत.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचा उत्कृष्ट कादंबरीसाठीचा ‘उत्तम बंडू तुपे पुरस्कार’ मसापचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते आणि मसापचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचा ‘शंकर पाटील स्मृती पुरस्कार’, मिळाला. नंतर ‘साहित्यवलय उत्कृष्ट स्त्रीवादी कादंबरी पुरस्कार’ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या हस्ते ठाणे येथे प्रदान करण्यात आला. तसेच जळगाव येथे ‘दिवाकर चौधरी स्मृती पुरस्कार’ मिळाल्याने पुरस्कारांची मालिकाच सुरू झाली. आतापर्यंत मराठी साहित्य क्षेत्रात अनेक स्त्रीविषयक कादंबऱ्या असतानाही ‘बाय गं’ लिहाविशी वाटली. कारण समाज म्हणून स्त्रीचा विचार आजवर साहित्यात कुठेच झालेला नसल्याचे विद्या पोळ जगताप यांनी सांगितले. स्त्रिया म्हणजे फार महान, चांगल्या किंवा केवळ पुरुषी वर्चस्वाने पिचलेल्या, अबला असा कुठलाही टोकाचा सूर न लावता फक्त सामान्य स्त्री जीवन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच स्त्रीवादी चळवळीला पुरुषांविरूद्धचा संघर्ष न मानता सक्षमीकरणाला नवी दिशा देण्याची गरज व्यक्त केली आहे, असे त्यांनी सांगितले. ‘बाय गं’ ला छ. चौथे शिवाजी स्मृती राज्य पुरस्कार हा शाही पुरस्कारही नुकताच जाहीर झाला असून साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते अहिल्यानगर येथे तो प्रदान करण्यात येणार आहे.