Satara News : मराठी भाषा जागतिक स्तरावर नेण्यात विनोद कुलकर्णींचा सिंहाचा वाटा

पुसेगाव : अभिजात भाषेचा दर्जा मिळविणे म्हणजे त्या भाषेतील साहित्य, कला, आणि संस्कृतीच्या गौरवाचा मान्यता मिळवणे. मराठी भाषेला हा दर्जा दिला गेल्यामुळे तिच्या ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना मान्यता मिळाली. अभिजात भाषांच्या यादीत समावेश झाल्यामुळे मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर उंची वाढवण्यात सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व साहित्यिक श्री विनोद कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
संस्कृती प्रकाशन पुणे व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पुसेगाव यांच्यावतीने कै.सतीशतात्या फडतरे यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा प्रथमच सामाजिक व राजकीय कार्यकर्ते कै. सतीशतात्या फडतरे कार्यगौरव पुरस्कार साहित्य, सहकार, बॅकिंग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आखिल भारतीय साहित्या महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संस्कृती प्रकाशनच्या संस्थापिक व साहित्यिक सुनिताराजे पवार, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, जि. प. महिला बालकल्याण माजी सभापती वैशाली फडतरे, नंदकुमार सावंत उपस्थित होते.
ना. महेश शिंदे म्हणाले, कै.सतीशतात्या फडतरे यांनी सामाजिक व राजकीय काम करत असताना सर्वसामान्य जनता केंद्रमानून काम केले. तसेच खटाव तालुक्याच्या विकासकामात त्यांचे मोठे योगदान आहे. सतिशतात्यांनी कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कौशल्याच्या जोरावर अनेक महत्वाची पदे भूषविली.
तसेच अनेक राजकीय विरोधकांना नामशेष करण्यात ते यशस्वी झाले होते. कै.सतिशतात्या फडतरे कार्यगौरव पुरस्कार त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून काम करणार्या कार्यक्षम असणार्या विनोद कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्तिला देऊन सुनिताराजे पवार व त्यांच्या सहकार्यांनी योग्य व्यक्तिची निवड केली आहे.
प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, विनोद कुलकर्णी यांनी पत्रकारतेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या सर्वागीण विकास व साहित्य क्षेत्र वाढावे, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. सातारमधील जनता बँक व गुजराथी अर्बन बँक रसातळाला गेल्या होत्या.
विनोद कुलकर्णी यांनी मायक्रो प्लॅन करुन या दोन्ही बँकांचे नेतृत्व करुन अनिष्ट तफावतीतून बाहेर काढून ऊर्जावस्था आणण्याचे काम केले. सध्याचे लोकप्रतिनिधी ग्रामीण भागात न राहता शहरात जाऊन राहत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्यांचे प्रश्नांची जाण त्यांना राहिलेली नाही. राजकारणातून कार्यकर्ता ही संकल्पना नाहीशी होत चालली आहे.
विनोद कुलकर्णी म्हणाले, कै.सतिशतात्या फडतरे कार्यगौरव पुरस्कार मला प्रदान केलात त्याचा मला खरोखरच खरोखरंच आनंद होत आहे. कारण ज्या सातारा जिल्ह्यामध्ये मी जन्मलो, माझ्या जिल्ह्याच्या कर्मभूमीत माझा सत्कार केला, याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट नाही. सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात साहित्य चळवळ वाढावी, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय साहित्य महामंडळ सतत प्रयत्नशील असते. साहित्या चळवळीमुळे समाजाला नवी दृष्टी मिळते. लोकांना एकत्र आणता येतं आणि विचारांची देवाणघेवाण वाढते.
सुनिताराजे पवार व अविनाश फडतरे यांनी प्रास्ताविक केले. मोहन गुरव यांनी सुत्रसंचालन केले. दिनेश फडतरे यांनी आभार मानले. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, संदीप जाधव, गणेश जाधव, प्रदीप जाधव, गुलाबराव वाघ, अकुंश पाटील, संजय चव्हाण, अमृत नलवडे, संजय जाधव, सुसेन जाधव, नितीन चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.





