Satara News : सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध ; अशोकराव गायकवाडांच्या नेतृत्वात साताऱ्यात सर्वपक्षीय महामोर्चा

प्रभात वृत्तसेवा
वाई – भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सातारा शहरात सोमवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी भव्य ‘आंबेडकरी संविधान महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याच्या निर्धाराने आयोजित या महामोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते अशोकराव बापू गायकवाड करणार असून, राज्यभरातील आंबेडकरी, बहुजन आणि परिवर्तनवादी विचारांच्या शेकडो संघटनांचा या मोर्चाला पाठिंबा मिळाला आहे.दि. ६ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात एका वकिलाने चिफ जस्टिस भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने देशभरात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
या गंभीर घटनेवर शासनाकडून कठोर कारवाई करण्यात आलेली नाही, तसेच हल्लेखोराने प्रसारमाध्यमांपुढे आपल्या कृत्याचे समर्थन केले असल्याने लोकशाहीला धक्का बसल्याची भावना समाजाच्या सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत सर्वपक्षीय बैठक घेऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. “संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे,” असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच “लोकशाहीच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्यास प्राणांची आहुती देऊ,” अशी शपथ सर्व उपस्थितांनी घेतली.
यावेळी अशोकराव गायकवाड, सौ. वर्षा देशपांडे, दादासाहेब ओव्हाळ, गणेश भिसे, अरुण गाडेर, विशाल भोसले, उमेश चव्हाण, सतीश गाडे, संजय गाडे, चंद्रकांत कांबळे, स्वप्निल गायकवाड, अमर गायकवाड, श्रीकांत निकाळजे, रमेश गायकवाड, सुहास मोरे, आबासाहेब न्यायनीत, अप्पासाहेब गायकवाड, विलास लोंढे, प्रतीक गायकवाड, विश्वास सावंत, योगेश माने, राम मधाळे, प्रशांत उबाळे, मदन खंकाळ, वैभव गायकवाड, आप्पा तुपे, अमोल पाटोळे, विश्वनाथ जावळे, सत्यवान कमाने, अझर मनेर, धनाजीराव वाघमारे, दीपक चव्हाण, रेखा सकते, सौ. अर्चना बगाडे, सौ. सोनाली चव्हाण, संदीप माने, प्रकाश तोरणे, प्रवीण साळवे, अमर वाघमारे आणि रुपेश मिसाळ उपस्थित होते. हा ‘आंबेडकरी संविधान महामोर्चा’ साताऱ्यात लोकशाही आणि न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी एक ऐतिहासिक घटना ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार..
महामोर्चाची सुरुवात पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादनाने होईल. त्यानंतर मोर्चा भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून मोती चौक मार्गे पुन्हा पोवई नाक्यावर परत येईल. येथे मोर्चाचे सभेत रूपांतर होईल, जिथे विविध संघटनांचे नेते आणि पदाधिकारी आपले मनोगत मांडतील. अखेरीस शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहे.
सर्वपक्षीयांचा सहभाग..
या महामोर्चात रिपब्लिकन पार्टी (आठवले), वंचित बहुजन आघाडी, रिपाई (गवई), रिपाई (निकाळजे), रिपाई (कवाडे), बसपा, राष्ट्रीय समाज पक्ष, जनता क्रांती दल, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, डीपी आय, सर्व ओबीसी संघटना, ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन, लेक लाडकी अभियान, रिपब्लिकन सेना, देशप्रेमी सामाजिक संघटना, दलित महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रज्ञा सूर्य सामाजिक संघटना, ऑल इंडिया पॅंथर सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या प्रमुख संघटनांचा सहभाग राहणार आहे.





