प्रभात वृत्तसेवा सातारा – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे असून याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शुक्रवारी राज्यभर काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करण्यात आला. साताऱा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्यासह मान्यवरांचा सहभाग होता. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ७५ हजार रुपये देण्याची आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतकरी संकटात असूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, घनश्याम शिंदे, राजकुमार पाटील, अभयसिंह जगताप, सतीश चव्हाण, अर्चनाताई देशमुख, मेघाताई नलावडे, एडवोकेट पांडुरंग भोसले, बुवासाहेब पिसाळ, वैशालीताई जाधव, शैलजा कदम, नलिनीताई जाधव, विजयराव बोबडे, गोरखनाथ नलावडे, सचिन जाधव, सुनील सपकाळ, गिरीश फडतरे, राजाभाऊ जगदाळे,संजय पिसाळ, स्वप्निल वाघमारे ,किरण चौधरी युवराज पवार, प्रज्ञा गायकवाड, राजाभाऊ काळे आदी उपस्थित होते. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ६० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राची अक्षरशः राखरांगोळी झाली. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने ऐन दिवाळीत हिरावून घेतला. याबाबत विरोधकांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली. परंतु सरकारने केवळ पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांच्या हातात मात्र रेवड्या देण्याचे काम केले. विशेष म्हणजे ही मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अतिवृष्टीने काढणीला आलेली पिके वाहून गेली, गोठ्यातील दुभती जनावरं, बैल, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या तरी या सरकारनेही अद्याप मदत दिलेली नाही. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेत शेतकरी आहे.बाळासाहेब पाटील म्हणाले, नुकसान झालेल्या कोरडवाहू क्षेत्रासाठी सरकारकडून साडेआठ हजार रुपये जाहीर करण्यात आले असले तरी सरसकट १०० टक्के नुकसान दाखवण्यात येत नसल्याने सर्वच शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपये मिळणार नाहीत. काही शेतकऱ्यांच्या हातावर केवळ ४ ६ हजार रुपयेच टेकवण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारने जाहीर केलेले हे पॅकेज फसवे आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेल्याने रब्बी हंगामाच्या तयारीसाठी सरकार हेक्टरी १० हजार रुपये मदत देणार आहे. परंतु ही मदत अद्याप मिळालेली नाहीच पण हे पैसे मिळाल्यानंतर यातून मशागतीचा किंवा केवळ बियाण्यांचाही खर्च भागवता येणार नाही. त्यामुळं रब्बी हंगामाच्या तयारीसाठी सरकारने जाहीर केलेल्या रकमेपेक्षाही अधिक भरीव रक्कम मिळाली पाहिजे.