Satara News | मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणसंग्राम! ; 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर उपोषण

प्रभात वृत्तसेवा
सातारा – मराठा आरक्षणासाठी राज्य शासनासी संघर्ष करणारे अंतरवाली सराटीचे नेते मनोज जरांगे यांनी दि. 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या पूर्वसंध्येला पश्चिम महाराष्ट्रातून हजारो मराठा आंदोलक कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असून आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका साताऱ्यात मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली.
सकल मराठा समाजाच्या समन्वयक नेत्यांनी येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विवेकानंद जाधव, माऊली सावंत, किरण भोसले, सोहम शिर्के, विक्रम शितोळे, महेश जाधव, प्रकाश भोसले, राजेंद्र निकम, रवींद्र शेळके इत्यादी उपस्थित होते. लाखो मराठा बांधव नवी मुंबईत दि. 28 ऑगस्ट रोजी दाखल होणार आहेत.
त्यांच्या मुक्कामाच्या सोयीसुविधांची काटेकोर व्यवस्था केली जाणार असल्याचे विवेकानंद जाधव यांनी सांगितले. मुंबईत 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशाल मोर्चा व उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात तालुकानिहाय बैठकांचे नियोजन पूर्ण होऊन कार्यकर्ते आता मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी सिद्ध झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते पुणे जिल्ह्यातील चाकण येथील शिवाजी चौकामध्ये जमणार आहेत. तिथून हे आंदोलन किल्ले शिवनेरी येथील मुक्कामानंतर जुन्नर, चाकण, तळेगाव, खोपोली, पनवेलमार्गे दि. 28 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार आहे.मराठा समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे, हे प्रमाण सुमारे 32 टक्के इतके आहे.
सातारा जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यांत सुमारे 54 लाख नोंदी आढळून आल्या असून मराठा हाच कुणबी समाज आहे, तसा शासकीय अध्यादेश राज्य शासनाने काढावा, अशी मागणी पहिल्यापासून करण्यात येत आहे. यंदा आझाद मैदानावर मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच आम्ही उठणार आहोत, यावेळी राज्य शासनाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असे समन्वयकांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सकारात्मक..
सातारा जिल्ह्यातून माण खटावचा गणपती घेऊनच आम्ही आझाद मैदानावर बसून तेथे रोज बाप्पांची आरती करणार आणि ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघेल त्यादिवशी त्याचे अरबी समुद्रात विधिवत विसर्जन करणार आहोत. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा ते आमच्या या मागणीबद्दल सकारात्मक आहेत, असा विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला. जे विरोधी भूमिका घेतील त्यांचा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.





