Satara News – नगरपालिकेच्या सोनगाव कचरा डेपोच्या आगीचे तांत्रिक कारण समजावून घेत त्यावर ठोस उपाययोजना करून आग विझवणे गरजेचे आहे. मात्र जोरदार वारे आणि कचर्याचा बाहेर पडणारा गॅस यामुळे प्रत्यक्ष आग विझवणे दुरापास्त झाले आहे. एकीकडे हे शुक्लकाष्ट सुरू असताना दुसरीकडे सोनगाव कचरा डेपोच्या ठेक्याचे भांडवल करून तो ठेका आपल्याला मिळावा, यासाठी राजकीय स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित ठेकेदार कंपनीचा ठेका रद्द करण्याचा विषय चर्चेला येण्याची दाट शक्यता असून त्यावरून आता राजकीय घमासान रंगणार आहे. पालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये समन्वयाच्या तारा कशा जुळल्या आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन बजेटनंतर होणार्या पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. आरोग्य विभागाचे सभापती धनंजय जांभळे यांनी गेल्या दहा दिवसापासून आपल्या कामाचा प्रचंड झपाटा दाखवला आणि आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. मात्र, तरीही कचरा डेपोमध्ये कचर्यातून विघटन होणारा गॅस, जोरदार वारे आणि त्यातून पसरणारा धूर यामुळे सोनगाव, जकातवाडी या परिसरात अजूनही नागरिक अस्वस्थ आहेत. कचर्याच्या विघटनाचा शास्त्रीय अभ्यास आणि त्यावरील उपाययोजना यामध्ये आरोग्य विभागाची कर्मचारी यंत्रणा नापास झाली आहे. आरोग्य विभागप्रमुख राकेश गलीयल यांनाच नोटीस बजावण्यात आल्याने त्यांच्यामध्ये कामाची संभ्रमावस्था आहे. अजूनही सोनगाव अथवा शेंद्रे परिसरातून सातार्याकडे येताना सातत्याने कचऱ्यातून निघणार्या धुराचा नागरिकांना त्रास होत आहे. सोनगाव कचरा डेपो आग कचरा डेपोमधील कचर्याचे ढीग हलवून सध्या तेथील परिसर मोकळा करणे आणि गॅसचे विघटन होऊन ठिणगी पेटून आग पसरण्याला वाव मिळू नये, यासाठी व्यवस्था करायला हवी. मात्र तब्बल 1500 टन कचरा उचलून कुठे टाकायचा तो सुद्धा अडचणीचा मुद्दा आहे. त्यामुळे सध्या तरी कचर्याच्या ढिगावर पाणी मारणे आणि आग लागणार नाही याची दक्षता घेणे अशा प्राथमिक उपायांवरच आरोग्य विभागाने समाधान मानले आहे. आता नव्या ठेक्यासाठी अनेकांनी सरसावल्या बाह्या नगरपालिकेचे विकासाचे धोरण ट्रायल आणि एरर याच पद्धतीचे असते. इको सेव्ह या कंपनीला नोटीस बजावताना शिवानंद बायोटेकला बाजूला ठेवण्यात आले. या प्रकरणातील राजकीय वरदहस्त तगडा असल्याने तेथे पालिका प्रशासनाने कारवाईचे सगळे मुद्दे गुंडाळून ठेवले आहेत. केवळ अनामत जप्त करणे, पुढील धनादेश रोखणे आणि ठेका रद्द करणे इतक्याच उपाययोजनांपेक्षा बायोमायनिंग करणार्या महाराष्ट्रातील कंपन्यांना आमंत्रण देऊन त्यातून अभ्यासू ठेकेदार कंपनीला ठेका देणे जास्त उचित ठरणार आहे. मात्र त्याआधीच नगरपालिकेतील ठेकेदार कम नगरसेवकांची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांशी गोपनीय चर्चा सुरू असून स्वतंत्र की समन्वयाने यासाठी ठेकेदार कम नगरसेवकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका सुरू आहेत. यामध्ये काही पर्यावरण संरक्षक सुद्धा सामील असल्याची चर्चा असून नक्की धूर वणव्याचा की नवा ठेका मिळवण्यासाठी होणार्या प्रयत्नांचा, याविषयी सातारकरांना संभ्रम निर्माण झाला आहे.