Satara News : सातारा जिल्ह्यातील धोम-बलकवडी कालव्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या ओडिशा राज्यातील तीन परप्रांतीय तरुणांचा सिमेंट पाईपमध्ये अडकून गुदमरून मृत्यू झाला. ही घटना हिंगणगाव-आदर्की रस्त्यावरील सुळवस्ती येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी धोम-बलकवडी प्रकल्पाच्या पोटकालव्यात तीन तरुण पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्यात असलेल्या सिमेंट पाईपचा अंदाज न आल्याने तिघेही त्यात अडकले. पाईपमध्ये अडकून गुदमरल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ज्योतीराम नाईक, श्रीराम जगाई हेबरम आणि सतीन बीवजी नाईक या तिघांचा मृत्यू झाला असून ते सर्वजण मूळचे ओडिसा राज्यातील आहेत. कामानिमित्त ते सातारा जिल्ह्यात वास्तव्यास होते. घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तिन्ही तरुणांचे मृतदेह सिमेंट पाईपमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणाची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तिन्ही तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.