Satara | आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाने सर्पमित्राचा गेला जीव

कलेढोण, (प्रतिनिधी) – कलेढोण, ता. खटाव येथील सर्पमित्र महेश दत्तात्रय बाबर (वय 32) युवकाचा या नाग चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नाग चावल्यानंतर तो स्वत:हून उपचारासाठी दाखल झाला होता. मात्र, कलेढोण कुटीर रुग्णालयासह वडून, औंध येथे देखील वेळेत उपचार न भेटल्याने त्यांना मृत्यूला कवटळावे लागले, अशी चर्चा जनमानसात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विखळे येथील शिवारात शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास लोकवस्तीत नाग निघाल्यानंतर नागरिकांनी सर्पमित्र महेश बाबर यांना बोलावून घेतले असता, बाबर यांनी तातडीने जाऊन नागास पकडले. त्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडून देण्यासाठी पोत्यात भरत असताना नागाने बाबर यांच्या बोटास चावा घेतला. त्यानंतर बाबर यांनी 5 वाजून 20 मिनिटांनी कलेढोण कुटीर रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.
त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत नर्स यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, महेश बाबर यांची प्रकृती चिंताजनक होत चालली होती. अस्वस्थ होऊ लागल्याने त्यांना 6 वाजून 45 मिनिटांनी 108 नंबरला कॉल करून बोलवलेल्या रुग्णवाहिकेतून कलेढोण येथून जिल्हा रुग्णालय या ठिकाणी हलवण्यात आले.
परंतु, कातरखटाव दरम्यान रुग्णाची प्रकृती गंभीर होऊ लागली आहे, असे कलेढोण कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना कळवले असता त्यांच्या सांगण्यावरून आणखी डोस देण्यासाठी रुग्णवाहिका वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितले. परंतु, वडूज या ठिकाणी न जाता रुग्णवाहिका सरळ औंध येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आली.
त्या ठिकाणी आणखी सर्प विष प्रतिबंधक लस दिली गेली. मात्र, रुग्णाची अवस्था चिंताजनकच होऊ लागली. अखेर रात्री 9. 30 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालय येथे पोहचल्यानंतर बाबर यांना मृत घोषित केले व सकाळी सहा वाजता सातारा जिल्हा रुग्णालयातच शवविच्छेदन करण्यात आले.
सर्प दंश झालेले रुग्ण महेश बाबर यांना जिल्हा रुग्णालय येथे नेण्यासाठी 108 नंबरला कॉल केल्यानंतर रुग्णवाहिका येण्यासाठी एक तासाचा कालावधी लागला व रुग्ण घेऊन निघाल्यानंतर हा रुग्णवाहिकेचा कातर खटाव दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्याच अवस्थेत ड्रायव्हरने धोका पत्करुन कसेबसे वडूज ग्रामीण रुग्णालय गाठले.
मात्र, त्या ठिकाणी सर्प विष प्रतिबंधित लस रुग्णास देणे गरजेचे असताना काही शंकास्पद कारणाने 108 रुग्णवाहिकेने वडूज येथे न थांबता औंध रुग्णालय गाठले. या ठिकाणी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी सर्प विष प्रतिबंधक लस व दुसऱ्या रुग्णवाहिकेची सोय करून जिल्हा रुग्णालय सातारा येथे पाठवण्याची व्यवस्था केली.
मात्र, औंध येथे बाबर यांची प्रकृती चिंताजनक झाली. रुग्णवाहिका येण्यासाठी झालेला विलंब व त्यात रुग्णवाहिकेची तांत्रिक बिघाड अशा अनेक समस्या निर्माण झाल्याने बाबर यांना वेळेत उपचार न भेटल्याने त्यांना मृत्यूला कवटळावे लागले, अशी चर्चा जनमानसात आहे.
कुटीर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू ?
सर्पदंश झाल्यानंतर काही वेळातच महेश बाबर हे उपचारासाठी स्वतः कुटीर रुग्णालयात दाखल झाले. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नव्हते. रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या नर्स यांनी बाबर यांच्यावर उपचार केल्याचे त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांकडून सांगितले जात आहे.
मात्र, नेमके काय उपचार केले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच उपचारा दरम्यान रुग्णाची प्रकृती खालावत चालली आहे हे लक्षात येऊन देखील तातडीने पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
108रुग्णवाहिका एक तासाने आली
तब्बल एक तासाने रुग्णवाहिका आली. मात्र तोपर्यंत रुग्णाची अवस्था गंभीर होत आहे असे लक्षात येऊन देखील रुग्णालयाकडे आधीच एक रुग्णवाहिका असून देखील 108 रुग्ण वाहिकेची वाट का बघितली गेली ? याबाबत ही ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे आरोग्य सेवेच्या बेजबाबदार कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





