Ashok Kharat Case : भोंदू बाबा प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “भोंदूबाबांशी संबंध असलेल्या मंत्र्यांना तत्काळ पदावरून दूर करा,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप असून त्याच्याकडून काही आक्षेपार्ह व्हिडिओही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात काही राजकीय नेते आणि मंत्र्यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. “मंत्रालय भोंदूबाबांच्या सल्ल्यावर चालतंय” राऊत यांनी आरोप केला की, “राज्यातील काही मंत्री भोंदूबाबांच्या सल्ल्यावर काम करतात. मंत्रालयातील बदल्या-बढत्या यामध्येही अशा लोकांचा हस्तक्षेप होता.” विशेषतः माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधत, “शिक्षण खात्यातील निर्णयांवर या बाबाचा प्रभाव होता,” असा आरोप त्यांनी केला. सरकार उलथवण्यासाठी ‘तंत्र-मंत्र’? राऊत यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, “सरकार उलथवण्यासाठी तंत्र-मंत्र आणि विधी करण्यात येत होते. त्यामुळेच या प्रकरणावर धाडी टाकण्यात आल्या.” यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देत, संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. केसरकर यांचा राजीनामा घेतला पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जर पक्षाचे नेते असतील, त्यांचा जर अंधश्रद्धेवर विश्वास नसेल तर रुपाली चाकणकरांपाठोपाठी त्यांनी ताबडतोब या मंत्र्यांचा (केसरकर) राजीनामा घेतला पाहिजे. यावर आता स्वत: दीपक केसरकर यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले कि, एका इशानेश्वर मंदिरामुळे अशोक खरातची ओळख झाली होती, तसेच अशोक खरात माझ्या ऑफिसमध्ये कधीही आलेला नाही, असं स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिलं आहे.