Sanjay raut : इराणवर अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या सर्व घडामोडींमध्ये एक देश म्हणून भारताने पूर्णपणे आपले अस्तित्व गमावले आहे, असा दावा ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अमेरिका आणि इस्रायल जागतिक गुंडांसारखे वागत आहेत, तर कालपर्यंत आपल्या शौर्याचा अभिमान बाळगणारे भारतासारखे मोठे देश या गुंडांच्या एजंटांसारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत म्हणाले, भारताने इराण युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता, जो एक ज्वलंत मुद्दा बनला आहे. यामुळे भारतीय नेतृत्वाचा पोकळपणा जगासमोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटावर एकही शब्दही बोललेला नाही. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचा असा विचार होता की इराणला झुरळासारखे चिरडता येईल. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना मारल्यानंतर त्यांना वाटले की हे युद्ध संपेल, पण तसे झाले नाही. अनेक इराणी नेते, लष्करी कर्मचारी मारले गेले. तरीही, इराण इस्रायलशी लढत आहे आणि त्यांच्यावर हल्ला करत आहे. अमेरिका आणि इस्रायल जागतिक गुंडांसारखे वागत आहेत आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू असताना भारताने एक देश म्हणून आपले अस्तित्व गमावले आहे. भारतासारखे मोठे देश, जे शौर्याचा अभिमान बाळगतात, ते त्यांचे एजंट म्हणून वागत आहेत, असा दावा राऊत यांनी केला.