Sanjay Raut : “काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना काँग्रेसने घाम फोडला” ; पाच राज्यांच्या निवडणुकीवरून राऊतांची भाजपवर टीका

Sanjay Raut : देशातील पाच राज्याच्या म्हणजेच मध्य प्रदेशासह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान काल पार पडले. या निवडणुकांचा निकाल येत्या ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. दरम्यान, एग्झिट पोलचे निकाल समोर आले असून यामध्ये काही राज्यांत काँग्रेस विजयाचा झेंडा फडकवताना दिसत आहे. तर काही राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी,”भाजपाने २०१४ पासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा दिली. पण काँग्रेसच्या राहुल गांधींसह, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला. चारही राज्यात काँग्रेसची सत्ता असेल आणि मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांसह काँग्रेस सरकारमध्ये असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
त्याच सोबत पाच राज्यांच्या निवडणुकीच्या एग्झिट पोलबाबत राऊत म्हणाले, “भाजपाने २०१४ पासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली होती. पण त्याच काँग्रेसने आणि काँग्रेसच्या राहुल गांधीसह प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला. पंतप्रधान मोदींना आठ-आठ दिवस एका राज्यात राहावं लागतंय. गृहमंत्र्यांना संपूर्ण देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरावं लागतंय.” असे म्हणत भाजपवर सडकून टीका केली.
तसेच पुढे बोलताना, “हे ‘काँग्रेसमुक्त भारत’चं लक्षण नसून २०२४ ला तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे, याची ही हवा आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की, राजस्थानसह चारही राज्यात काँग्रेस पक्षाचं म्हणजेच इंडिया आघाडीचं सरकार बनेल आणि मिझोराममध्येही प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेस सत्तेत असेल,” असा विश्वास यावेळी संजय राऊतांनी व्यक्त केला.




