Sangita Wankhede on Manoj Jarange : मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मंगळवारी घेतला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजुरीही मिळाली. मात्र मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षणासाठी आणि सगेसोयरोच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी बुधवारी आंदोलनाची पुढील भूमिकाही स्पष्ट केली. मात्र कालपासून मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतचे आंदोलनातील काही जण त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत.
काल बुधवारी, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केल्यानंतर काही वेळातच जरांगे यांच्या कोअर कमिटीतील सदस्य अजय बारस्कर महाराज यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जरांगे पाटील यांनीही त्या आरोपांना लागलीच पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडण केले. मात्र बारस्कर महाराज यांच्यानंतर आता मराठा आंदोलनकर्त्या संगिता वानखेडे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाल्या संगिता वानखेडे?
शरद पवार यांच्यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन उभे केले आहे. शरद पवार जे सांगतात, केवळ तेवढेच मनोज जरांगे ऐकतात, या व्यतिरिक्त कोणाचेही ते ऐकून घेत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्या कार्यकर्त्याकडे जिवंत कारतूसे सापडली, त्याच वेळी मनोज जरांगे पाटील यांना कडकडून जाग येते. तेव्हाच ते मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करतात. तो पर्यंत त्यांनी अशी मागणी केली नाही. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच सर्व बॅनर लावले होते, हे तर सर्वांनाच माहीत आहे. शरद पवार यांचा पक्ष संपलेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून वोटबँक तयार करण्यासाठी शरद पवारांनी हे सर्व नाटक, हे सर्व ढोंग उभे केले असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, बारस्कर महाराज यांच्या आरोपांनंतर मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटले होते की, हा सरकारचा ट्रॅप आहे. आंदोलन फोडण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. बारस्कर यांच्यासह इतर 10 – 15 जण फुटले असल्याचे ते म्हणाले.
3 मार्चला मोठा रास्ता रोको –
बुधवारी आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली. 24 तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी 10.30 ते दुपारी 1 सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत 2 सत्रांत रास्ता रोको होईल. त्यानंतर 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळविण्यावर ते ठाम आहेत.