Sandeep Deshpande : आज ५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ‘ठाकरे बंधू’चा विजयी मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याचे आयोजन वरळीतील डोम सभागृहात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. तपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी परिधान केलेल्या टी शर्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आवाज मराठीचा असे लिहिलेला टी शर्ट त्यांनी परिधान केला आहे. त्यांनी एक्सवरून त्यांचा टी शर्ट परिधान केलेला फोटो शेअर केला आहे. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर लोकं येणार असल्याने डोम सभागृहात मोठा पोलीस बंदोबस्त सुरक्षेच्या कारणास्ताव तैनात करण्यात आला आहे. या मेळाव्यातून तब्बल १९ वर्षांनंतर मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे सर्वांत शेवटी भाषण करणार आहे. त्या आधी राज ठाकरे यांचे भाषण होणार आहे. तसेच मंचावर उपस्थित असणाऱ्या काही नेत्यांना बोलण्याची संधी यावेळी दिली जाणार आहे. या मेळ्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असणार आहे. याशिवाय शेकापचे नेते जयंत पाटील हे देखील असणार आहेत. तसेच इतरही अनेक मान्यवर मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आवाज मराठीचा ! pic.twitter.com/cPk2fYInxc — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 5, 2025 लक्ष वेधणारा टी-शर्ट अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सच्चा मनसैनिक संदिप देशपांडे यांच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या मेळ्यात कोणताही राजकीय पक्षाचा झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह नको असे आवाहन राज ठाकरेंनी केले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज घातलेल्या टी-शर्टने लक्ष वेधले आहे. देशपांडे यांनी परिधान केलेल्या हा टी शर्ट मराठीचा असल्याचे दिसत आहे. टी-शर्टवर बाराखडी लिहिलेली आहे. तसेच ‘आवाज मराठी’चा असे देखील लिहिलेलं दिसत आहे. ठाकरे बंधू काय बोलणार? या मेळाव्याचा हेतू ठाकरे बंधूंनी आधीच स्पष्ट केला असून माय मराठी भाषेच्या मुद्यावर हे दोघेही एकत्र आले आहेत. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्ती करणारा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही कडाडून विरोध दर्शविला. तसेच राज्यभरातून या निर्णया विरोधात सरकारवर टीकेची झोड उठल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. सुरुवातीला हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, सरकारने हा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्रित येत विजयी मेळावा करणार असल्याची घोषणा केली. आता या मेळाव्यातून ठाकरे बंधूंची तोफ कुणाकुणावर डागली जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा: ठाकरेबंधू आज दिसणार एकत्र; महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण जुळणार?