“आज तुझा मर्डर फिक्स” ; सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना उघडउघड धमकी

Sameer Bhujbal vs Suhas Kande । राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. नागरिक हळूहळू मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसून येत आहे. तर दुसरीकी नांदगाव विधानसभा मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचे समोर आले आहे. कारण अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी दिली. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे सुहास कांदे समीर भुजबळांना स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत . या सर्व प्रकारामुळे नांदगाव मतदारसंघात चांगलाच गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आज तुझा मर्डर फिक्स – सुहास कांदे Sameer Bhujbal vs Suhas Kande ।
सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आल्याचे दिसून आले. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आमचा वेळ वाया घालवू नका ; मतदारांनी व्यक्त केला संताप Sameer Bhujbal vs Suhas Kande ।
काही वेळाने समीर भुजबळांनी अडवून ठेवलेले मतदार संतापल्याचे पाहायला मिळाले. “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो…आमचे आधारकार्ड तपासा, आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातलेच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला.
छगन भुजबळ म्हणाले की, दोन्ही उमेदवार समोर आले हा मुद्दा नाही. कांदे यांच्या संबंधित व्यक्तीची शाळा आहे. तिथे हजार लोक आणून ठेवले होते. सचिन मानकर हिस्ट्री शुटर तिथे पिस्तूल घेऊन आला. तुला मारून टाकेल, असे समीरला बोलला, असा आरोप त्यांनी केलाय. तेच पोलिसांनी त्याला गाडीत बसवले आणि नंतर सोडून दिले. पोलीस असे वागत असतील तर कसे चालेल? मी एसपींना सांगितले आहे की, तुम्ही असे कराल तर तिथे खून पडतील. याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असेल, अशा रीतीने दादागिरी चालू असेल तर आम्हीही तयार आहोत, असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिला. इथे मर्डर होतील, पोलीस यंत्रणा ताब्यात घेतली आहे. या दादागिरी विरोधात समीर भाऊ निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी म्हटले.





