रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेली ‘ती’ समाधी हटवा, संभाजीराजेंची पत्र लिहित मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sambhajiraje Chhatrapati | रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहित मागणी केली आहे.
वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. तसेच, ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नाही. त्यामुळे 31 मे 2025 पूर्वी ही समाधी हटवावी, असे छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीराजेंनी काय मागणी केली?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीराजेंनी म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.
भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 411 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.





