“कुणाल कामरावरून विधानसभेत गोंधळ घालणारे सगळे देशद्रोही”, संभाजी भिडेंचा हल्लाबोल, वाघ्याच्या समाधीवरही भाष्य

सांगली: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुणाल कामरा प्रकरणाने चांगलाच गदारोळ माजवला. सत्ताधारी आणि विरोधकांनी सभागृहात या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ घातला. या प्रकरणावर संभाजी भिडे गुरुजी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. “कुणाल कामरावरून विधानसभेत गोंधळ घालणारे सगळे देशद्रोही आहेत,” असं ते म्हणाले. याशिवाय, रायगडच्या वाघ्या कुत्र्याची कथा सत्य असून संभाजीराजे भोसले यांचं मत चुकीचं आहे, असा दावाही भिडेंनी केला. सांगलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
“लोकशाहीला शोभणारं नाही हे नाटक”
कुणाल कामरा प्रकरणावर सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला, ज्यामुळे सभागृहाचा मौल्यवान वेळ वाया गेला. यावर भिडे म्हणाले, “कुणाल कामराचं हे नादान नाटक आणि त्यावरून विधानसभेत सुरू असलेला गोंधळ लोकशाहीला शोभत नाही. कोणाचं नाव घेत नाही, पण ज्यांनी हा नीचपणा केला ते सगळे देशद्रोही आहेत.” त्यांनी पुढे आर. आर. आबांचं उदाहरण देत म्हटलं, “आबांनी डान्स बार बंद करण्याची हिंमत दाखवली होती. आज कामरासारख्यांची हॉटेलं ही डान्स बारचीच सावत्र भावंडं आहेत.”
“वाघ्याची कथा सत्य, संभाजीराजे चूक!” –
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू असून, संभाजीराजे छत्रपती यांनी त्याला ऐतिहासिक आधार नसल्याचा दावा करत 31 मेपर्यंत पुतळा हटवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर भिडे म्हणाले, “संभाजीराजे जे बोलतात ते चुकीचं आहे. वाघ्याची कथा खरी आहे. त्याने शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली होती. त्या काळात माणसांपेक्षा कुत्री जास्त एकनिष्ठ होती, हे दाखवण्यासाठी हा पुतळा गरजेचा आहे.”
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामराने व्यंगात्मक कविता केल्यानंतर त्याच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. याच प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही हक्कभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे. या घटनेने राजकीय वातावरण तापलं असताना संभाजी भिडेंच्या वक्तव्याने चर्चेला नवं वळण मिळालं आहे.





