Samantha Ruth Prabhu: ‘तो फक्त चित्रपटांचा हिरो नाही’; मुख्यमंत्री विजय यांच्या भेटीनंतर सामंथा रुथ प्रभू भावूक
Samantha Ruth Prabhu सामंथाच्या मते, विजय यांची ऊर्जा, त्यांचा स्वभाव, लोकांशी संवाद साधण्याची पद्धत आणि समाजावर पडणारा त्यांचा प्रभाव पाहता ते आयुष्यात काहीतरी मोठं आणि अर्थपूर्ण काम करण्यासाठीच तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास फक्त चित्रपटांपर्यंत मर्यादित राहील, असं तिला कधीच वाटलं नाही.

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिने नुकतीच तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची भेट घेतली. या भेटीनंतर तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत विजय यांच्याबद्दलचा आदर आणि विश्वास व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.
सामंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुख्यमंत्री विजय यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले. या पोस्टमध्ये तिने अनेक वर्षांपासून विजय यांना जवळून पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल नेहमीच एक वेगळी भावना असल्याचं सांगितलं.
तिने लिहिलं की, चेन्नईला आल्यानंतर तिला सर्वात जास्त आनंद एका गोष्टीचा होता आणि तो म्हणजे मुख्यमंत्री विजय यांची भेट घेण्याचा. अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम करताना तिला नेहमीच जाणवत होतं की विजय हे केवळ चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित राहणारे व्यक्तिमत्त्व नाही.
सामंथाच्या मते, विजय यांची ऊर्जा, त्यांचा स्वभाव, लोकांशी संवाद साधण्याची पद्धत आणि समाजावर पडणारा त्यांचा प्रभाव पाहता ते आयुष्यात काहीतरी मोठं आणि अर्थपूर्ण काम करण्यासाठीच तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास फक्त चित्रपटांपर्यंत मर्यादित राहील, असं तिला कधीच वाटलं नाही.
तिने विजय यांच्या राजकीय प्रवासाचंही कौतुक केलं. आधीपासूनच यशस्वी असलेलं करिअर मागे ठेवून पूर्णपणे नव्या क्षेत्रात प्रवेश करणं हे खूप धाडसाचं काम असल्याचं तिने म्हटलं. राजकारणात येऊन लोकांसाठी काम करण्याचा निर्णय घेणं सोपं नसतं. त्यासाठी दूरदृष्टी, समर्पण आणि समाजासाठी काम करण्याची प्रामाणिक इच्छा आवश्यक असते, असंही ती म्हणाली.
View this post on Instagram
सामंथाने पुढे असाही विश्वास व्यक्त केला की, विजय येत्या काळात केवळ विरोधकांनाच नाही तर त्यांच्यावर आधीपासून विश्वास ठेवणाऱ्या समर्थकांनाही त्यांच्या कामगिरीने आश्चर्यचकित करतील. हा विश्वास त्यांच्या पदामुळे नाही, तर त्यांची मेहनत, जिद्द आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची इच्छा पाहून निर्माण झाल्याचं तिने स्पष्ट केलं.
तिने विजय यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. त्यांना अधिक ताकद, योग्य निर्णय घेण्याचं शहाणपण आणि त्यांच्या उद्दिष्टांप्रती कायम ठाम राहण्याची प्रेरणा मिळो, अशी प्रार्थना तिने केली.
या पोस्टच्या शेवटी सामंथाने विशेषतः तरुणांसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला. आयुष्य हे आपण लहानपणी पाहिलेल्या स्वप्नांपेक्षा खूप मोठं असतं. प्रत्येकाने फक्त स्वतःच्या यशाचा विचार न करता समाजासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचाही विचार केला पाहिजे, असं तिने सांगितलं.
सामंथाची ही पोस्ट अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. अनेकांनी तिच्या शब्दांमधून विजय यांच्याबद्दलचा आदर, विश्वास आणि भविष्यातील अपेक्षा स्पष्टपणे दिसत असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावरही या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत.





