तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? सदावर्तेंकडून भय्याजी जोशींचं समर्थन अन् राज ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते भय्याजी जोशी यांनी केले होते. ते विद्याविहारमधील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन चांगलाच वाद पेटला आहे. अधिवेशन सभागृहातही त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी आवाज उठवला आहे.
तसेच शिवसेना आणि मनसेच्या दोन्ही ठाकरे बंधुंनी भय्याजी जोशींवर जोरदार हल्लाबोल केला. भय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केली. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधुंवर निशाणा साधला. तर भय्याजी जोशींच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. राज ठाकरेंच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या, स्वत:ची लेकरं कॉन्व्हेंटमध्ये शिकवतात अशा शब्दात गुणरत्न सदावर्तेंनी ठाकरेंवर खरमरीत टीका केली.
गुणरत्न सदावर्ते नेमकं काय म्हणाले?
भय्याजी जोशी यांचा भाषेवरील अभ्यास खूप मोठा आहे. या देशात कुठेही भाषेची सक्ती करणं गैर आहे, विविध भाषा हे या देशाच्या सौंदर्याचं प्रतिक असून देशाच्या सहिष्णूतेचं दर्शन त्यातून होतं. संविधानानुसार भय्यूजी जोशी यांच्या वक्तव्यात आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही, भाषेची सक्ती करणं हे मुघली विचारांचं प्रतिक आहे, असं म्हणत सदावर्ते यांनी भय्याजी जोशी यांचं समर्थन केलं.
तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकली
तसेच सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकली, मला असं वाटतय की, जेमतेम म्हणजे एखादं कार्टुनिस्ट असलेले तुम्ही कलाकार आहात, तुम्ही भाषेचे ज्ञानी नाहीत. तुम्ही लिफ्ट करुन राजकारणी झाला आहात. राज ठाकरे ज्याप्रकारे व्यक्त झाले, त्याची मला किव येते.
मला हे सांगा राज ठाकरे, तुमची जी मुलं आहेत, तुमच्या ज्या औलादी आहेत, त्या कोणत्या शाळेत शिकल्या? असा सवाल करत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. तुमची लेकरं, कॉन्व्हेंट, आयबीडीपीमध्ये शिकतात आणि तुम्ही दुसऱ्याला सांगता ही भाषा शिका, ती भाषा शिका, अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
भय्याजी जोशींचे वक्तव्य काय?
राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वक्तव्य केले या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद उमटले आहेत. घाटरकोपर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुंबई ही कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा असून वेगवेगळ्या परिसरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. तर गिरगाव येथे हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकावं असं काही नाही, असं विधान भैय्याजी जोशी यांनी केलं आहे.





