S. Jaishankar : भारताचा उदय अटळ आहे आणि त्याच्या विकासाचा मार्ग केवळ भारतच आपल्या ताकदीच्या आधारावर ठरवेल, इतरांच्या चुकांच्या आधारे नाही, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी शनिवारी सांगितले. रायसिना डायलॉगमध्ये ते बोलत होते. भारताने चीनला अमेरिकेचा प्रमुख स्पर्धक बनण्यास मदत केली होती. त्या भारताला त्याच प्रकारचे आर्थिक फायदे देण्याची चूक अमेरिका पुन्हा करणार नाही, असे अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडाऊ याच परिसंवादात म्हणाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी जयशंकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. इराणच्या युद्धनौकेला कोचीमध्ये आश्रय देणे आणि श्रीलंकेजवळ अमेरिकेकडून इराणची नौका बुडवली जाणे, याबद्दल बोलताना भारताची भूमिका भारतच निश्चित करतो. निव्वळ सुरक्षा पुरवठादार म्हणून नाही. तर, या प्रदेशातील वास्तवांकडे दुर्लक्ष करत नाही, म्हणूनच हिंद महासागरात भारताची वाढती भूमिका आहे, हे देखील त्यांनी नमूद केले. सागरी कायद्यावरील संयुक्त राष्ट्रांच्या कराराचे पालन करण्याची गरज आहे, यावरही जयशंकर यांनी भर दिला.