S. Jaishankar : पश्चिम आशियामध्ये वेगाने विस्तारत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. भारत हा शांतता, संवाद आणि मुत्सद्देगिरीचा पुरस्कर्ता असून, या भागात त्वरित तणाव कमी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी सोमवारी राज्यसभेत केले. या संघर्षाच्या काळात नागरिकांची सुरक्षा आणि संयम बाळगणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यसभेत सुओ मोटो (स्वत:हून) निवेदन देताना जयशंकर (S. Jaishankar) म्हणाले की, या प्रदेशातील भारतीय समुदायाचे कल्याण आणि सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पश्चिम आशियातील सरकारांशी यासंदर्भात भारत सतत संपर्कात असून, भारतीयांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. भारताचे राष्ट्रीय हित, विशेषतः ऊर्जा सुरक्षा आणि व्यापारी उद्दिष्टे यांना केंद्रस्थानी ठेवूनच सरकार आपली पुढील धोरणे आखत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने दिलेल्या उत्तरामुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या अस्थिरतेवर भाष्य करताना परराष्ट्र मंत्र्यांनी आश्वस्त केले की, भारतीय ग्राहकांचे हित लक्षात घेऊनच ऊर्जा सुरक्षेबाबत निर्णय घेतले जातील. बाजारातील जोखीम आणि उपलब्धता यांचा ताळमेळ राखत, भारतीय ऊर्जा कंपन्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पूर्ण पाठबळ दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक संघर्षाच्या या काळात भारताची प्राथमिकता ही आपल्या देशाच्या हितांचे रक्षण करणे हीच असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.