NCP News : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात नव्या समीकरणांची चर्चा रंगली असताना आता रुपाली पाटील ठोबरे यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी केली आहे. (NCP News) नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरणानंतर रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात रूपाली पाटील ठोंबरे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. (NCP News) दरम्यान, ठोंबरे यांनी लिहिलेल्या पत्राची प्रत पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनाही पाठवण्यात आली आहे. काय म्हटलंय पत्रात? रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे की, मी अॅड. रूपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून मागील अनेक वर्षांपासून अजित पवार दादा यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे कार्यरत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द मागील वीस वर्षांची असून या काळात मी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला आहे. माजी नगरसेविका व शहर सुधारणा समिती अध्यक्षा म्हणून काम करताना मी प्रशासनावर प्रभावी पकड ठेवून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पुणे महानगरपालिका तसेच पदवीधर निवडणुका लढविताना मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यातून माझे जनाधार व संघटन कौशल्य मी सिद्ध केले आहे. मला सभागृहाचे नियम, प्रक्रिया व कामकाजाचे सखोल ज्ञान असून, मी प्रश्न मांडणे, शासनाला जबाबदार धरणे व जनतेच्या मुद्यांवर ठाम आणि आक्रमक भूमिका घेणे यात पारंगते आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच अन्यायाविरोधात ठामपणे उभी राहिले आहे आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावी आवाज बनले आहे. (NCP News) आज पक्षाला अशा अभ्यासू, लढाऊ व निष्ठावंत महिला नेतृत्वाची गरज आहे, जी सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकेल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देईल, त्या दृष्टीने मी स्वतःला सक्षम उमेदवार म्हणून आपणासमोर उमेदवारीची मागणी करत आहे. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की, माझ्या कार्याचा व अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (NCP News)