Assam News : आसाममध्ये बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढती; आकडेवारी एकदा पाहाच…
आसाममध्ये अवैध स्थलांतरितांच्या नागरिकत्व पडताळणी आणि ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Assam News : आसाममध्ये अवैध स्थलांतरितांच्या नागरिकत्व पडताळणी आणि ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सरकारने विधानसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील हजारो लोकांच्या नागरिकत्वाची पडताळणी अजूनही सुरू आहे. इतकेच नाही तर, सरकारने असेही म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत कायदेशीर कारवाईनंतर १,६७९ लोकांना बांगलादेशात परत पाठवण्यात आले आहे. (Assam News)
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभेला माहिती दिली की, सध्या राज्याच्या मतदार यादीत ९१,३८५ मतदार नोंदणीकृत आहेत, ज्यांना ‘डी-व्होटर्स’ म्हणजेच नागरिकत्वाबाबत शंका असलेले मतदार मानले जाते. या व्यक्तींच्या नागरिकत्व पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. (Assam News)
सोनितपूर जिल्ह्यात सर्वाधिक १३,७१९ ‘डी-व्होटर्स’ आहेत. यानंतर बारपेटा जिल्ह्याचा क्रमांक लागतो, जिथे ८,०८१ डी-व्होटर्स आहेत. डी-व्होटर्स आणि परदेशी नागरिकांना ओळखण्यासाठी राज्यात परदेशी न्यायाधिकरणे कार्यरत आहेत. आतापर्यंत या न्यायाधिकरणांनी ५६,७२८ लोकांना परदेशी म्हणून घोषित केले आहे. उच्च न्यायालयांनीही ८३१ लोकांच्या प्रकरणांमध्ये निकाल दिले आहेत. (Assam News)
कायदेशीर प्रक्रियेनंतर कारवाई ! (Assam News)
विधानसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत आसाममधून १,६७९ लोकांना हद्दपार करण्यात आले. यामध्ये परदेशी न्यायाधिकरणांनी परदेशी म्हणून घोषित केलेल्या १९३ लोकांचा समावेश आहे. सरकारने म्हटले आहे की, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
आसाम सरकारच्या म्हणण्यानुसार, १९५० च्या स्थलांतरित हकालपट्टी कायद्यांतर्गत हद्दपारीची प्रक्रिया राबवली जात आहे. ज्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा ज्यांची अपीले प्रलंबित आहेत, त्यांना परत पाठवण्यात आलेले नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.






