Petrol-Diesel: मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे गंभीर पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. इंधन संपल्याच्या आणि दरवाढीच्या अफवांनी राज्यभरात धुमाकूळ घातला असून, पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या तुफान रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्हा प्रशासनाने इंधन वाटपावर कडक मर्यादा लागू केल्या आहेत. प्रशासनाचा मोठा निर्णय: कुणाला किती मिळणार इंधन? Petrol-Diesel नागरिकांकडून होणारी इंधन साठवणूक आणि पंपांवरील गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५’ अंतर्गत मर्यादा निश्चित केल्या आहेत. आदेशानुसार दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपयांचे पेट्रोल. चारचाकी व तीन चाकी वाहनांना जास्तीत जास्त २,००० रुपयांपर्यंतच इंधन मिळेल. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव आणि साठवणूक रोखण्यासाठी यापुढे कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. खाजगी कंपन्यांकडून इंधन दरवाढ – Petrol-Diesel युद्धाच्या छायेमुळे भारतातील सर्वात मोठ्या खाजगी इंधन विक्रेत्या कंपनीने (नायरा एनर्जी) किमतीत मोठी वाढ केली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटर ५.३० रुपयांनी, तर डिझेल ३ रुपयांनी महागले आहे. आज मुंबईत पेट्रोल १०३.५४ रुपये आणि डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद झाल्यामुळे जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचे चटके आता बसू लागले आहेत. हिंगोली आणि संभाजीनगरमध्ये कडक पावले – Petrol-Diesel छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपांवरील सीसीटीव्हीमध्ये शेकडो नागरिक टाक्या ‘फुल्ल’ करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने तातडीने मर्यादेचे आदेश दिले आहेत. हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पेट्रोल पंप चालकांना उपलब्ध साठा, प्राप्त साठा आणि कंपन्यांकडून येणारा साठा दर्शनी भागातील बोर्डवर लिहिणे अनिवार्य केले आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पंपांवर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाचे आवाहन: अफवांना बळी पडू नका – जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. केवळ समाजमाध्यमांवरील अफवांमुळे मागणी आणि पुरवठ्यात तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ आवश्यकतेनुसारच इंधन भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.