रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प 1 मेपर्यंत हटवा अन्यथा स्वतः हटवू; संभाजी ब्रिगेडचा सरकारला इशारा

मुंबई : संभाजी ब्रिगेडने रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाच्या मुद्यावरून राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने 1 मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्वतः पुढाकार घेऊन हे शिल्प हटवण्याची कारवाई करेल, असा अल्टिमेटम या संघटनेने दिला आहे. यामुळे या मुद्यावरील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेद्वारे रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर संभाजी भिडे यांनी त्यांच्या या मागणीला विरोध दर्शवला होता. संभाजीराजे भोसले जे म्हणाले ते 100 टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याविषयी मी वाचले आहे. ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हेच सत्य आहे. त्यामुळे त्याचे स्मारक रायगडावर केले गेले, असे भिडे म्हणाले. त्यांच्या या भूमिकेनंतर संभाजी ब्रिगेडने 1 मेपर्यंत वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी केली आहे.
संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर या प्रकरणी म्हणाले की, राज्य सरकारने 1 मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून घ्यावा. सरकारने आमचा हा अल्टिमेटम पाळला नाही, तर संभाजी ब्रिगेड हा पुतळा हटवण्यास पुढाकार घेईल. आम्ही या प्रक्रणी संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. सरकार त्यांच्या भूमिकेला कोणता प्रतिसाद देते त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मराठा जोडो यात्रा संपल्यानतंर 1 मे रोजी आम्ही स्वतः पुतळा काढण्यास जाणार.





