कर्नाटकात शाळेच्या पुस्तकातून शहीद भगतसिंग यांचा धडा वगळल्याने केजरीवाल नाराज, म्हणाले- हा शहीदांचा अपमान आहे

नवी दिल्ली – कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील मजकूर हटवल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, हे पाऊल महान स्वातंत्र्यसैनिकाच्या हौतात्म्याचा अपमान असून कर्नाटक सरकारने हा निर्णय मागे घ्यावा.
आपने ट्विट करून म्हंटले की, “भाजपचे लोक अमर शहीद सरदार भगतसिंग यांचा इतका द्वेष का करतात? शालेय पुस्तकातून सरदार भगतसिंग यांचे नाव काढून टाकणे हा अमर शहीदांच्या बलिदानाचा अपमान आहे. आपल्या हुतात्म्यांचा हा अपमान देश अजिबात सहन करणार नाही. भाजप सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागेल.
दरम्यान, ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (एआयडीएसओ) आणि ऑल इंडिया सेव्ह एज्युकेशन कमिटी (एआयएसईसी) यासह काही संघटनांनी असा दावा केला आहे की, कर्नाटक सरकारने शाळेच्या पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील मजकूर काढून टाकला आहे. यासोबतच आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या भाषणाचा दहावीच्या कन्नड पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
कर्नाटक सरकारने केला निर्णयाचा बचाव –
आम आदमी पक्षाने पुस्तकातून भगतसिंगांचा मजकूर काढून टाकणे लाजिरवाणे म्हटले आणि कर्नाटक सरकारने ते पुन्हा अभ्यासक्रमात पुनर्संचयित करण्याची मागणीही केली. दुसरीकडे, कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कन्नड अभ्यासक्रमात हेडगेवार यांच्या भाषणाचा समावेश करण्याच्या निर्णयाचा बचाव केला आहे.
नागेश म्हणाले की, पाठ्यपुस्तकात हेडगेवार किंवा आरएसएसबद्दल काहीही नव्हते, फक्त त्यांचे भाषण होते. ज्यामध्ये लोकांसाठी विशेषत: तरुणांसाठी काय प्रेरणादायी असले पाहिजे हे सांगण्यात आले आहे. आक्षेप घेणाऱ्यांनी पुस्तक वाचले नसल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेत भगवत गीता –
दुसरीकडे, कर्नाटक सरकार शाळांमध्ये हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता शिकवण्याच्या विचारात आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी गीतेचा सकारात्मक परिणाम सांगितल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यासंदर्भात सीएम बोम्मई म्हणाले की, शालेय अभ्यासक्रमात भगवत गीता समाविष्ट करण्याच्या निर्णयावर चर्चा सुरू आहे. यापूर्वी, गुजरात सरकारने 6वी ते 12वीच्या शालेय अभ्यासक्रमात गीतेचा समावेश करण्याचा निर्णयही घेतला होता.





