पिंपरी: वारंवार सांगूनही फिरणाऱ्या टवाळखोरांची संख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे नाकाबंदी करताना आता अशा टवाळखोरांकडून पूर्वीच्या वाहतूक नियमभंगाच्या गुन्ह्यातील दंड वसूली पोलिसांनी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात चार लाख 17 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या 33 दिवसांच्या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाच हजार 791 जणांवर भा. द. वि. कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. म्हणजे प्रत्येक दिवशी 175 गुन्ह्यांची नोंद होत आहे. असे असूनही फिरणाऱ्या टवाळखोरांची संख्या कमी होताना दिसत नाही. दुचाकीवरून फिरणाऱ्या टवाळखोरांना आळा घालण्यासाठी खासगी वाहने रस्त्यावर आणण्यास मनाई करणारा आदेश पोलिसांनी काढला. अत्यावश्यक सेवेतील वगळता इतर वाहनांना इंधन देण्यास मनाई केली आहे. तरीदेखील अजूनही काहीही कारण सांगत टवाळखोर फिरत आहेत. या टवाळखोरांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी या टवाळखोरांकडून दंड वसूली सुरू केली आहे.
संचारबंदीच्या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी वाहतूक आणि शहर पोलीस यांनी सुमारे 90 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. या नाकाबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तरीदेखील फिरणाऱ्या टवाळखोरांची संख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे आता पोलिसांनी दंड वसूलीचे अस्त्र उपसले आहे. बुधवारी (दि. 22) पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 202 केसेसमधील एक लाख 44 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला. तर गुरुवारी 231 केसेसमध्ये दोन लाख 72 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी दिली.
पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी हातमौजे, सॅनिटायजर व इतर सामग्री प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र तरीही काम दंडाची रक्कम वसूल करताना एटीएम हाताळावे लागते. त्यातून करोनाचा लागण होण्याची भिती कर्मचाऱ्यांना वाटत आहे.