Nagar : भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन २१ डिसेंबरपासून

शिर्डी : भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन शनिवार दि.२१ डिसेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याना दिल्या आहेत. साधारण एका आठवड्याचे नियोजन या आवर्तनातून करण्यात आले असल्याने लाभक्षेत्रातील गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेले साठवण तलाव भरून घेण्यास मदत होईल.
सद्यस्थितीत काही तालुक्यातील गावांमधील पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची घट झाल्याने त्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसचे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी निर्माण झाला आहे.
या आवर्तनामुळे या गावांमधील साठवण तलाव, बंधारे भरून घेऊन पाणी टंचाई दूर करण्यात थोडी मदत होईल. या तलावावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजनाच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याचा प्रश्न सुटण्यास दिलासा मिळेल.
आवर्तनाच्या दरम्यान जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, शेवटच्या गावापर्यत पाणी मिळेल, याची काळजी घेण्याच्या सूचना ना.विखे यांनी दिल्या.





