RBI cancels licence: अपुऱ्या भांडवलामुळे आणि उत्पन्नाच्या मर्यादित शक्यतांमुळे मुंबईतील ‘सर्वोदय सहकारी बँके’चा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मंगळवारी रद्द केला. १२ मे २०२६ रोजी कामकाज संपल्यानंतर बँकेचे सर्व बँकिंग व्यवहार बंद करण्यात आले आहेत. आरबीआयने महाराष्ट्राचे सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक यांना बँकेचे विसर्जन (वाइंडिंग अप) करण्याचे आदेश देण्यास तसेच प्रशासक अथवा लिक्विडेटर नियुक्त करण्यास सांगितले आहे. बँकेच्या लिक्विडेशननंतर प्रत्येक ठेवीदाराला ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ’ (डीआयसीजीसी) मार्फत जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘सर्वसमावेशक निर्देश’ लागू करण्यात आल्या त्या दिवशीच्या आकडेवारीनुसार सुमारे ९८.३६ टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवीची रक्कम डीआयसीजीसीमार्फत मिळण्यास पात्रता होती. ३१ मार्च २०२६ पर्यंत डीआयसीजीसीने विमा संरक्षित ठेवींमधून एकूण २६.७२ कोटी रुपयांची रक्कम आधीच अदा केली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ती विद्यमान ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे परत करण्यास सक्षम नाही. तसेच बँकेने विविध नियामक अटींचे पालन करण्यातही अपयश आल्याचे निदर्शनास आले आहे. परवाना रद्द झाल्यानंतर सर्वोदय सहकारी बँकेला ठेवी स्वीकारणे, ठेवी परत करणे यासह कोणतेही बँकिंग व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.