निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये वाद? रामदास आठवलेंनी मित्र पक्षांना दिला ‘हा’ इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा कोकण प्रदेशचा मेळावा पार पडला. यावेळी आरपी आयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार संपन्न झाला. यावेळी या मेळाव्यात बोलताना त्यांनी महायुतीला इशारा दिला आहे.
काय म्हणाले रामदास आठवले ?
पूर्वी भाजप आणि शिवसेनेला युती म्हणायचे. आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे आमचं कुठेही नाव येत नाही. शासन आपल्या दारी आणि आम्ही आमच्या घरी अशी मिश्कील टिपण्णी आठवले यांनी केली. रिपब्लिकन पार्टी आल्यानंतर महायुती झाली आहे. ते शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपने लक्षात घ्यायला हवी. आमचा पक्ष छोटा असला तरी कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे आम्ही ठरवतो.
ज्यांच्या सोबत मी जातो त्यांना सत्ता मिळते. गेल्या तीन दशकाचा महाराष्ट्राच्या राजकारणात हा अनुभव आहे. गट किती असू द्या. पण रामदास आठवले हा पठ्ठ्या दिल्लीत असणारा एकमेव आहे. तसेच बाबासाहेबांनी सांगितले आहे. सत्तेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आणि मी ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते. त्यांना सत्ता मिळाली, मला मिळते, मला नाही मिळाली तर त्यांनाही मिळत नाही. त्यामुळे सत्तेसाठी असणारी बार्गेनिंग पॉवर आमच्या पक्षात आहे, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.





