Ram Navami 2026 – काही वर्षांपूर्वीपर्यंत रामनवमी म्हणजे मंदिरात होणारी साधी पूजा आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा शांत उत्सव अशी ओळख होती. मात्र, अयोध्येतील भव्य राम मंदिर उद्घाटनानंतर या सणाचा संपूर्ण चेहरामोहराच बदलला आहे. आळेफाटा परिसरात आता रामनवमी हा केवळ एक धार्मिक विधी न राहता, तो एक भव्य, उत्साही आणि सर्वसमावेशक लोकउत्सव बनला आहे. गुरूवारी (दि. २६) आळेफाटा, आळे, वडगाव आनंद, बेल्हे, राजुरी, पिंपळवंडी आणि आणे या गावांमध्ये काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रांनी संपूर्ण परिसर राममय झाला होता. भगवे ध्वज, पारंपरिक फेटे, ढोल-ताशांचा गजर आणि सियावर रामचंद्र की जय अशा जयघोषांनी वातावरण भारून गेले होते. विशेष म्हणजे, या उत्सवात यंदा तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. युवकांसोबतच तरुणींनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. पूर्वी मर्यादित स्वरूपात साजरा होणारा हा सण आता प्रत्येक गावात भव्य स्वरूप धारण करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण उत्सव शांततेत आणि शिस्तीत पार पडावा यासाठी आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा – रामनवमी मिरवणूक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. आळेफाटा परिसरातील हा रामनवमी उत्सव पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे झेप घेत असतानाच, नवी पिढी आणि समाजमनाला एकत्र आणणारा एक भव्य सोहळा म्हणून यंदा प्रकर्षाने समोर आला आहे. देखणी सजावट आणि जन्मोत्सव सोहळा प्रत्येक गावात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आकर्षक सजावट आणि समाजाला एकत्र आणणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम-सीतेचे देखणे फलक, धार्मिक संदेश देणारे बॅनर आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेले नागरिक हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. दुपारी श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’ या गीताच्या सुरावटींनी आणि जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. फुलांच्या कमानी आणि विद्युत रोषणाईमुळे सर्वत्र दिव्य वातावरण अनुभवायला मिळाले. श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम यंदाच्या उत्सवात केवळ धार्मिकता नव्हे तर सामाजिक पैलूही ठळकपणे दिसून आला. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, तर काही गावांमध्ये समाजजागृतीसाठी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रांनंतर रात्री श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. सोशल मीडिया माध्यमातून नागरिकांनी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत या उत्सवाचा आनंद जगभर पोहोचवला, ज्यामुळे डिजिटल युगाची झलकही या सोहळ्यात स्पष्टपणे दिसून आली.