TOP 10 NEWS : राम मंदिर भाजपचं कार्यालय… नेपाळमध्ये पुन्हा Gen-Z आंदोलन भडकले ते ‘BSNL’चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च; वाचा टॉप 10 बातम्या…
ओमानच्या किनाऱ्याजवळील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘जीएफएस गॅलेक्सी’ या व्यापारी जहाजावर हल्ला झाला आहे. या जहाजावर कार्यरत असलेल्या ११ भारतीय क्रू मेंबर्सपैकी १० जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले.

1 – होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर इराणचा हल्ला; 10 भारतीयांना वाचवले, 1 बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘जीएफएस गॅलेक्सी’ या व्यापारी जहाजावर हल्ला झाला आहे. या जहाजावर कार्यरत असलेल्या ११ भारतीय क्रू मेंबर्सपैकी १० जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, एक भारतीय अद्याप बेपत्ता आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घटनेचा तीव्र निषेध करत, बेपत्ता नागरिकाच्या शोधासाठी ओमान प्रशासनासोबत बचाव मोहीम सुरू केली आहे. हल्ल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढला असून, जागतिक व्यापार आणि तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताने सागरी मार्गांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
2 – नेपाळमध्ये पुन्हा Gen-Z आंदोलन भडकले.! बेरोजगारीवरुन तरुणांचा उद्रेक; PM बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
नेपाळमध्ये बेरोजगारी आणि सरकारी धोरणांविरोधात Gen-Z तरुणांचे आंदोलन पुन्हा तीव्र झाले आहे. राजधानी काठमांडूमध्ये मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले असून, पंतप्रधान बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
गेल्या काही दिवसांत तीन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. तरुणांना रोजगा आणि भविष्याबाबत आश्वास्त करण्यात बालेन सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ आणि संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कोणत्याही ठोस योजना नाहीत. यामुळे तरुणांमध्ये नाराजी आणि रोष वाढत आहे. सध्या बालेन शाह सरकारने या घटनांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे आंदोलनकर्ते आणि विरोधी पक्षांकडून तीव्र टीकेची झोड सुरु आहे.
3 – गिरीजा राऊतांच्या आरोपांवर विनायक राऊतांचा पलटवार; ‘सर्व आरोप खोटे’ असल्याचा दावा
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधात सुनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर त्यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली आहे. आपल्यावरील आणि कुटुंबीयांवरील आरोप निखालस खोटे असल्याचा दावा राऊत यांनी केला.
गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह सात जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राऊत यांनी आरोपांमागे वेगळा हेतू असल्याचे सांगत तडजोडीसाठी मोठ्या आर्थिक मागण्या करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. 5 कोटी रुपये, 3BHK टेरेस फ्लॅट आणि इलेक्ट्रिक कारची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
4 – हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर ! मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून सरकारला घेरले
महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून नागपुरात सुरू होणार आहे. राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या कामकाजात मंत्री अनुपस्थित राहिल्याने तब्बल ३५ मिनिटे कामकाज ठप्प झाले. या प्रकारावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत, सभागृहाच्या कामकाजाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला.
हिवाळी अधिवेशनात शेती, कायदा-सुव्यवस्था, रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांसह अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे.
5 – शेरनी अगर शांत है तो डकारणा कधी भूलती नहीं.! नवनीत राणा यांचं विरोधकांना जोरदार उत्तर
माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी खासदार झाले याच्या वेदना आहेतच, पण मी शांत नाही. “शेरनी अगर शांत है तो डकारणा कभी भूलती नहीं,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे यांच्या टीकेवर बोलताना राणा यांनी महिलांबाबत वक्तव्य करताना मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला. ‘मी माझी मर्यादा कधीही विसरले नाही’, असं नवनीत राणा म्हणाल्या.
“लोक नगरसेवकपदासाठी एवढं लोटांगण घालतात. नवनीत राणाचा स्वाभिमान इतका अटळ आहे की तिने राज्यसभेची संधी सोडून स्वाभिमान जपला. राज्यसभेला कधी दुसऱ्यांच्या दारी गेले नाही, त्याला ठोकर मारली. त्यामुळे मी माझ्या विचारांची पक्की आहे.”
6 – उमर अब्दुल्लांच्या आरोपांवर भाजपचा पलटवार; ‘पुरावे द्या, अन्यथा माफी मागा’
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी भाजप आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असून, नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना फोडण्यासाठी प्रत्येकी २० ते ३० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर भाजपने जोरदार पलटवार करत “पुरावे द्या, अन्यथा जाहीर माफी मागा,” असे आव्हान दिले आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी उमर यांचे आरोप बेजबाबदार आणि निराधार असल्याचे म्हटले. तसेच जम्मू-काश्मीर सरकारच्या अपयशापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे आरोप केल्याचा दावा करत, आरोप सिद्ध न झाल्यास उमर अब्दुल्लांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही भाजपने दिला आहे.
7 – राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय.. तेच चोर, तेच पोलीस.! शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी खोचक टीका
अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी कडाडून प्रहार केला आहे. “राम मंदिर सध्या राम मंदिर नसून, ते आरएसएस आणि भाजपचे कार्यालय आहे. ते खऱ्या अर्थाने बांधल्यावरच मी त्याला भेट देईन.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “सरकारने राम मंदिर ट्रस्टची स्थापना केली. एसआयटीची स्थापनाही सरकारनेच केली. तेच चोर, तेच पोलीस. निर्णय काय होणार?” शंकराचार्य “गायींना राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी” 81 दिवसांच्या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. ते आज (12 जुलै) रायबरेली येथे पोहोचले.
8 – २१ वर्षांच्या लिंडा नोस्कोव्हाचा धमाका; मुचोव्हाचा पराभव करत पटकावले पहिले विम्बल्डन जेतेपद
चेक प्रजासत्ताकच्या २१ वर्षीय लिंडा नोस्कोव्हाने आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोव्हाचा ६-२, ५-७, ६-३ असा पराभव करत विम्बल्डन २०२६ चे महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. दोन तास चाललेल्या या थरारक सामन्यात नोस्कोव्हाने १० एस मारत कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जिंकले.
दुसऱ्या सेटमध्ये मुचोव्हाने ५-२ वरून पुनरागमन केले होते, मात्र नोस्कोव्हाने निर्णायक सेटमध्ये कोणतीही चूक केली नाही. दिग्गज पेट्रा क्वितोवानंतर (२०११) विम्बल्डन जिंकणारी ती सर्वात तरुण चेक खेळाडू ठरली असून ती जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर पोहोचणार आहे.
9 – BSNLचा स्वस्त धमाका.! १०७ रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगचा फायदा
वाढत्या रिचार्ज दरांच्या पार्श्वभूमीवर सरकारी दूरसंचार कंपनी BSNLने ग्राहकांसाठी परवडणारा प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. BSNLच्या १०७ रुपयांच्या व्हाउचरमध्ये ग्राहकांना २० दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये ३ जीबी हाय-स्पीड डेटा आणि २०० मिनिटांचे मोफत व्हॉईस कॉलिंग दिले जाते.
डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होतो. हा प्लॅन देशभरातील टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध असून BSNL सेल्फ-केअर ॲपद्वारे रिचार्ज करता येतो. या प्लॅनमध्ये SMS सुविधा नसली तरी कमी खर्चात सिम सक्रिय ठेवण्यासाठी हा पर्याय ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
10 – आमिर खान “लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर”; तिसऱ्या लग्नावरून वाद, नितेश राणेंची टीका
अभिनेता आमिर खानने ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅटशी तिसरे लग्न केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी आमिरवर टीका करत त्याला “लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर” असे संबोधले. हिंदू तरुणांनी कोणाला आदर्श मानायचे आणि कोणाच्या चित्रपटांना पाठिंबा द्यायचा, याचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, बजरंग दलानेही आमिरविरोधात आंदोलन करत त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या या खासगी विवाहसोहळ्याला दोन्ही कुटुंबीय आणि मोजके जवळचे मित्र उपस्थित होते.




